भाजी, फळ विक्रेत्यांचे स्थलांतर रखडले
------------
व्यापारी महासंघ आक्रमक, बाजारपेठ बेमुदत बंदचा इशारा
गंगाखेड, ता. ३१ (बातमीदार) : शहरातील भाजी व फळ विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेल्या मार्केटचे काम बंद असल्याने विक्रेत्यांचे स्थलांतर रखडले आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण व वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी व्यापारी महासंघातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आली.
गंगाखेड बाजारपेठेत भाजी व फळ विक्रेत्यांमुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजी व फळ मार्केटसाठी जागा उपलब्ध करून दिली असतानाही त्यावरील बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. मागील दहा महिन्यांपासून काम बंद असल्यामुळे विक्रेत्यांचे नियोजित ठिकाणी स्थलांतर होऊ शकलेले नाही. परिणामी अहिल्यादेवी होळकर चौक ते श्रीराम चौक, अहिल्यादेवी होळकर चौक ते शनिवार बाजार, हेडगेवार चौक ते बसस्थानक रोड, श्रीराम चौक ते बसस्थानक तसेच श्रीराम चौक ते सराफा मार्केट या प्रमुख मार्गांवर भाजी व फळ विक्रेते आणि अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. या प्रश्नाबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व्यापाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सात दिवसांत प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन नगर परिषद प्रशासनाने दिले होते. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी व्यापारी महासंघातर्फे मुख्याधिकारी, नगर परिषद गंगाखेड, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे व पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली. मात्र, अपेक्षित कार्यवाही न झाल्याने २६ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी व आमदार गुट्टे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी योग्य ती कारवाईसाठी ४ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
((चौकट)))
अतिक्रमण, वाहतूक कोंडी
या मुदतीत भाजी व फळ विक्रेत्यांचे स्थलांतर करून बाजारपेठेतील अतिक्रमण व वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविला नाही तर व्यापारी महासंघातर्फे बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमाणी व उपाध्यक्ष प्रशांत फड यांची स्वाक्षरी आहे.
-------