नऊ वर्षांनंतर हरितालिका-गणेश चतुर्थीचा दुर्मीळ योग!

नऊ वर्षांनंतर हरितालिका-गणेश चतुर्थीचा दुर्मीळ योग!
Published on
नऊ वर्षांनंतर हरितालिका-गणेश चतुर्थीचा योग! --- यंदा गणरायाचा १२ दिवस मुक्काम; सकाळी हरितालिका पूजन, दुपारी गणेश स्थापना --- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १३ ः यंदा तिथीच्या वैशिष्ट्यपूर्ण गणितामुळे नऊ वर्षांनंतर हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत आहे. गणरायाचा मुक्कामही १२ दिवसांचा राहणार आहे. पंचांगानुसार, सोमवारी (ता. १४) सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी असून, सकाळी ७:०७ वाजता तृतीया समाप्त होणार आहे. हरितालिका व्रतासाठी सूर्योदयव्यापिनी तृतीया महत्त्वाची मानली जाते. दुसरीकडे गणेश चतुर्थीच्या व्रतासाठी मध्यान्ह काळातील चतुर्थीला महत्त्व आहे. त्यामुळे सूर्योदयाला तृतीया आणि मध्यान्हाला चतुर्थी असा योग यंदा जुळून आला. हरितालिका पूजनासाठी सकाळी ६:२२ ते ७:०६ हा शुभकाळ आहे. त्यानंतर गणेश स्थापनेसाठी सकाळी ११:२० ते दुपारी १:४४ हा मुख्य मुहूर्त आहे. मात्र, गणेश स्थापना करण्यासाठी केवळ याच वेळेची सक्ती नसून, ब्राह्ममुहूर्तापासून दुपारी १:५१ पर्यंत सोयीनुसार पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले. हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने उपवास कधी सोडायचा, हा प्रश्नही अनेकांना पडला. हरितालिका व्रत करणाऱ्या महिलांनी कुटुंबाची पारंपरिक व्रतपद्धती पाळावी. गणेश चतुर्थीचा उपवास करणाऱ्या भाविकांनी मंगळवारी (ता. १५) उत्तरपूजेनंतर नैवेद्य दाखवून, त्यानंतर तीर्थ अथवा पाणी घेऊन उपवास सोडावा. यापूर्वी २००६ आणि २००९ मध्ये हरितालिका व गणेश चतुर्थीचा असा योग आला होता. त्यानंतर आता पुन्हा हा दुर्मिळ योग जुळून आला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये १२ दिवसांचा गणेशोत्सव झाला होता. दरम्यान, गुरुवारी (ता. १७) गौरी आवाहन, शुक्रवारी (ता. १८) गौरीपूजन, तर शनिवारी (ता. १९) गौरी विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील यंदाचे धार्मिक पर्व तिथींच्या वैशिष्ट्यपूर्ण जुळणीमुळे अधिकच विशेष ठरणार आहे. -- (((कोट))) यंदा तृतीया आणि चतुर्थीचा योग तिथीच्या नियमानुसार एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे भाविकांनी संभ्रम न बाळगता आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार हरितालिका व्रताचे पालन करावे. गणेश स्थापनेसाठी दिलेल्या शुभकाळात स्थापना करणे उत्तम आहे. गणेश चतुर्थीचा उपवास करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी उत्तरपूजेनंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. श्रद्धा आणि शास्त्रोक्त पद्धतीला प्राधान्य द्यावे. - सुरेश केदारे, गुरुजी (पुरोहित)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com