

Hingoli Traffic Congestion
esakal
हिंगोली: वाहतूक कोंडी अन् शहराचे अतूट नाते असल्याने नेहमीच वाहतक कोंडी अंगवळणी पडू लागली आहे. शहरातील वाहतुकीचे नियमन होण्याची शक्यता दुर्मिळ वाटू लागली आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या हिंगोली शहराच्या नगररचनेचा कुठलाही मागमूस नसल्याने दीर्घकालीन समस्येवर अजूनही नेमकेपणाने उत्तर सापडलेले नाही. अकोला, कळमनुरी, औंढा या रस्त्यावर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग जातात. या सगळ्या बाजूंनी रस्त्याला ओरबाडण्यात कुठलीही कसर न ठेवल्याने अरुंद रस्त्यांच्या जाळ्यात असलेले हिंगोली अशी अवस्था सध्या तरी बनली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून शहरातील बाजारपेठ असलेल्या जवाहर रोड, मोंढा, इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, रिसाला बाजार, नांदेड नाका हा भाग श्वास वाहतुकीच्या कोंडीत अडकला असून हे चौक कधी मोकळा श्वास घेणार या विवंचनेत हिंगोलीकर अडकले आहेत. विविध प्रयोग, नियोजन, बदल करूनही तेथील कोंडी तसूभरही घटलेली नसून चौकातील अतिक्रमण, बेशिस्त वाहतुकीला आळा बसत नसल्याने कोंडीत दिवसाकाठी वाढ होत आहे.