उद्या तहसीलवर धडकणार शेकापचा बैलगाडी मोर्चा
-----
हेक्टरी ५० हजारांची मदत, थकीत पीकविमा देण्याची मागणी
----
केज, ता. १९ : बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविल्याने निर्माण झालेली भीषण दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवरून शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध रविवारी (ता. २१) सकाळी अकराला केज तहसील कार्यालयावर भव्य ‘बैलगाडी मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड (पाटील) यांनी दिली. यासंदर्भातील निवेदने केज तहसीलदारांना देण्यात आली आहेत.
पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतातील उभी पिके डोळ्यांदेखत करपली. महागडी खते आणि बियाणे खरेदी करून लावलेला भांडवली खर्चही निघण्याची शक्यता उरलेली नाही. त्यातच २०२५ मधील खरीप व रब्बी हंगामाचा हक्काचा पीकविमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. या गंभीर परिस्थितीमुळे बळिराजा आर्थिक संकटात सापडला असून, शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ संपूर्ण तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, असा पवित्रा शेकापने घेतला आहे. हा ऐतिहासिक बैलगाडी मोर्चा केज शहरातील गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि मंगळवार पेठमार्गे थेट तहसील कार्यालयावर धडकणार आहे. तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने आपल्या बैलगाड्यांसह या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन भाई मोहन गुंड, भाई अशोक रोडे, रामलिंग पाटील, मंगेश देशमुख, बाबाराजे गायकवाड, शाम चिंचोलीकर, दिगांबर मगर, महेश गायकवाड, दिनकरअण्णा भोसले, अनिल गलांडे, अण्णा नखाते, किशोर सुरवसे, संतोष भोसले, हनुमंत चाळक व अंगद ससाने आदींनी केले आहे.