पान तीन लीड
--
फळ रोपवाटिकेचे ४१ एकर भुईसपाट
ढोकी ग्रामस्थांच्या उपोषणाला यश, पोलिस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण
सकाळ वृत्तसेवा ः
ढोकी, ता. १३ ः राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत असलेल्या येथील ४१ एकर जिल्हा फळ रोपवाटिकेच्या जमिनीवर करण्यात आलेले बेकायदेशीर अतिक्रमण प्रशासनाने शनिवारी (ता. १२) शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात एका दिवसात हटवले. ढोकी ग्रामस्थांनी उभारलेल्या तीव्र आंदोलनानंतर आणि साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही मोठी कारवाई करण्यात आली.
प्रसिद्ध फळ रोपवाटिकेचा इतिहास
गेल्या ४० ते ५० वर्षांपासून ही जिल्हा फळ रोपवाटिका धाराशिवसह शेजारच्या तीन-चार जिल्ह्यांसाठी कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र ठरली होती. येथे आंबा, चिंच, जांभूळ, वड, पिंपळ यांसह अनेक विविध प्रकारच्या रोपांची निर्मिती करून रास्त दरात विक्री केली जात असे. दररोज १०० ते २०० वाहने येथून रोपे खरेदी करण्यासाठी येत असत. जवळपास १५ ते २० कर्मचारी येथे कार्यरत होते. मात्र, २०२५ मध्ये या मोकळ्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. तत्कालीन प्रशासनाने हे अतिक्रमण एकदा हटवले होते; परंतु काही दिवसांतच पुन्हा तिथे बेकायदेशीर अतिक्रमण झाले. शासकीय जमिनीवरील वारंवार होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात ढोकीतील सर्वपक्षीय नागरिक, ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
मोठा फौजफाटा आणि कारवाई
शनिवारी दुपारी बारापासून सायंकाळी सहापर्यंत प्रशासनाने धडक मोहीम राबविली. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार, नायब तहसीलदार महादेव शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक विलास हजारे यांच्या नेतृत्वाखाली १४ अधिकारी, १०० पोलिस कर्मचारी, महिला पोलिस, जलद प्रतिसाद पथकाच्या दोन तुकड्या आणि कृषी विभागाचे ५० कर्मचारी या कारवाईत तैनात होते. कृषी विभागाकडून प्रवीण चोपडे, शीतल लिमकर तर महसूल विभागाकडून मंडळ अधिकारी संभाजी तोगरे, तलाठी व्यंकटेश लोमटे, हरीश जाधव, प्रसाद मिसाळ यांनी प्रत्यक्ष कारवाईत सहभाग घेतला.
कारवाईदरम्यान अतिक्रमणधारकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने सर्व पत्रे व झोपड्या भुईसपाट केल्या. हटवलेल्या साहित्याची विल्हेवाट लावून संपूर्ण ४१ एकर क्षेत्र पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करत कृषी विभागाच्या ताब्यात दिले. कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी ढोकी ग्रामस्थांच्या पुढाकाराने व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने १०० ते १५० नागरिकांचे ‘ग्रामसुरक्षा दल’ स्थापन करण्यात आले आहे. हे दल या क्षेत्रावर नियमित देखरेख व सुरक्षा ठेवणार आहे.
शासकीय प्रकल्पांसाठी जागेची मागणी
या मोकळ्या झालेल्या ४१ एकर जागेचा वापर ढोकी येथील ग्रामीण रुग्णालय, विविध शासकीय कार्यालये, बसस्थानक, एमआयडीसी आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांच्यासाठी करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या शासकीय प्रकल्पांना गती देऊन ढोकीचा सर्वांगीण विकास साधणे हाच ढोकीकरांचा मुख्य संकल्प असल्याचे नागरिकांनी सांगितले.
......
ढोकी ः येथील ४१ एकर जिल्हा फळ रोपवाटिकेच्या जमिनीवरील अतिक्रमण जेसीबीद्वारे हटविताना पोलिस आणि जिल्हा प्रशासन.
फोटो क्रमांक ः OSM26B06973