हुतात्म्यांच्या त्यागाने घडला जळकोटचा मुक्तिसंग्राम
तिरुका, घोणसीच्या हुतात्म्यांच्या त्यागाने इतिहास उजळला; भूमिगत राहून स्वातंत्र्यसैनिकांनी दिला लढा
-----
विवेक पोतदार
जळकोट, ता. १६ : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जळकोट तालुक्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची आठवण होत आहे. हैदराबाद संस्थानाच्या निजामशाहीच्या जोखडातून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त झाला. या लढ्यात जळकोट तालुक्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी उघडपणे तसेच भूमिगत राहून सहभाग घेतला. तिरुका आणि घोणसी येथील हुतात्मा स्मारकांमुळे या धगधगत्या लढ्याच्या आठवणी आजही जाग्या आहेत.
देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र, मराठवाड्याला निजामशाहीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी संघर्ष करावा लागला. निजामशाहीच्या अन्याय-अत्याचारामुळे जनता त्रस्त झाली होती. या परिस्थितीत जळकोट, तिरुका आणि घोणसी परिसरातील अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. अनेकांनी भूमिगत राहून निजामशाहीविरोधात लढा दिला, तर काहींनी हौतात्म्य पत्करले.
जळकोटचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वीरसंगपा कारभारी हे दरवर्षी मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि लोकप्रतिनिधींना बोलावून त्या काळातील लढ्याचे थरारक अनुभव सांगत असत. त्यांच्या आठवणींमधून तालुक्यातील स्वातंत्र्यलढ्याची अनेक पाने पुढे आली. आता ते हयात नसले तरी त्यांनी सांगितलेले प्रसंग आजही स्मरणात आहेत.
उदगीरचे लेखक खंडेराव कुलकर्णी यांच्या ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम एक पर्व’ या पुस्तकातही जळकोट तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा उल्लेख आहे. तिरुका येथील क्रांतीवीरांमध्ये पांडुरंग सायनां नादरगे, संग्राम आत्माराम पांडे, पांडुरंग महादू तिडके, तुकाराम चामवाड, गोविंद राम, गणपती जळबा, शेषना भीमा वडर, नरसिंग महादू भोपळे, चंदर नागनाथ, नामदेव साहेबा गवंडी, चंद्रा ऊर्फ चंदू नागनाथ आदींचा उल्लेख करण्यात आला आहे.
तिरुका येथील हुतात्मा स्मारकाच्या फलकावर सिद्ध तुका कराड, नामदेव साहेबा गवंडी, नरसिंह महादू चव्हाण, पांडुरंग महादू तिडके, पांडुरंग संगना, संग्राम आत्माराम पांडे, गोविंद रामा महार, छंदा नागनाथ महार, गणपती जळया महार, शेषा भीमा वडार, तुकाराम चामवाड सादुरेडी आणि बापूराव रामा आदींची नावे आहेत.
-----
घोणसीचेही महत्त्वपूर्ण योगदान
घोणसी परिसरातील रामा ऊर्फ रामत्रा कोळी, व्यंकटराव परगे, नरसिंग बिरादार, बाबाराव मालुसरे, पंढरीनाथ मालुसरे, माधवराव पाटील, वसंतराव पवार, गोविंद पांचाळ, गंगाधर गव्हाणे, संगप्पा तेली, माणिक सावंत, संतराम बिरादार, ज्ञानोबा सोनार, किशन गोसावी, व्यंकटराव बिरादार, विठ्ठल पाटील, गंगाराम डावळे, पिराजी तोगरे आदी स्वातंत्र्यसैनिकांनी निजामशाहीविरोधात लढा दिला. व्यंकटराव परगे यांच्या मार्गदर्शनाखाली घोणसी येथे तिरंगा फडकवण्यात आला. निजामशाहीने तिरंगा फडकवण्यास बंदी घातली असतानाही धाडसाने तिरंगा फडकविल्याचे समोर आल्यानंतर २१ स्वातंत्र्यसैनिकांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचे या लढ्याच्या इतिहासात नमूद आहे.