जळकोट-उदगीर महामार्गावरील अतिक्रमणांना ‘अल्टिमेटम’
----
जळकोट, ता. १३ (बातमीदार) ः नांदेड-जळकोट-उदगीर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा आणि अपघातांचा धोका निर्माण होत असताना, अखेर अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या ३० मीटर आरओडब्ल्यू क्षेत्रातील अतिक्रमणे व बांधकामे १५ सप्टेंबरपर्यंत स्वतःहून हटविण्याचे आदेश देण्यात आले असून, मुदतीनंतर १६ सप्टेंबरपासून प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे टपरीधारक, हॉटेल व्यावसायिकांसह अन्य अतिक्रमणधारकांची धावपळ सुरू झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रविवारी (ता. १३) महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी तसेच वाहतूक सुरक्षित करण्यासाठी महामार्गालगतची बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार नांदेड व लातूर जिल्हाधिकारी कार्यालयांनीही संबंधित विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत. महामार्गाच्या ३० मीटर क्षेत्रात अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे विभागाने नमूद केले आहे. कारवाईचा खर्चही संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार आहे. त्यामुळे टपरीधारक, हॉटेल व्यावसायिकांसह अन्य अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, महामार्गालगत वाढलेल्या झुडपांमुळेही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी झुडपांच्या फांद्या थेट रस्त्यावर आल्या आहेत. अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारताना या ‘जीवघेण्या झुडपांचे अतिक्रमण’ कधी हटणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. याबाबत उपविभागीय अभियंता शिंदे यांनी झुडपे हटविण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली असून मंजुरीनंतर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती दिली.