(युटिलिटी न्यूज)
पान तीन अँकर
-------------
दहावी ते पदवीधर युवक-युवतींना नोकरीची संधी
परभणीत २९ सप्टेंबरला १३ ठिकाणी रोजगार मेळावे, ५०० हून अधिक पदांसाठी थेट निवड
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १४ ः शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून येत्या ता. २९ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल १३ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. विविध कंपन्या व आस्थापनांमधील ५०० हून अधिक रिक्त पदांसाठी या मेळाव्यात उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन निवड केली जाणार आहे.
दहावी, बारावी, विविध डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला असून, ग्रामीण भागातील युवकांनाही आपल्या जवळच्या ठिकाणी कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर मुलाखत देण्याची संधी मिळणार आहे. परभणी शहरात पाच ठिकाणी, तर गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पालम, पूर्णा, मानवत, सोनपेठ आणि सेलू येथे प्रत्येकी एका ठिकाणी रोजगार मेळावा होणार आहे. परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसर, श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय, जिजाऊ खासगी आयटीआय, श्री व्यंकटेश मंगल कार्यालय आणि कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय येथे मुलाखती घेतल्या जातील. याशिवाय गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालय, जिंतूर, पाथरी, पालम, पूर्णा व मानवत येथील स्वामी समर्थ गुरुपीठाच्या शाखा, सोनपेठ येथील (कै.) रमेश वरपुडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि सेलू येथील नूतन महाविद्यालयातही रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
---
मुलाखतीपूर्वी मोफत प्रशिक्षण
रोजगार मेळाव्यात केवळ कंपन्या आणि उमेदवारांना एकत्र आणण्यापुरता उपक्रम मर्यादित न ठेवता उमेदवारांना मुलाखतीसाठी सक्षम करण्यावरही भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आयटीआयमध्ये १५ दिवसांचे मोफत प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात रोजगार मेळाव्याची माहिती, करिअरविषयक मार्गदर्शन, रिझ्युमे तयार करणे, स्वपरिचय, मुलाखतीचे तंत्र, व्यक्तिमत्त्व विकास आणि संवादकौशल्य याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. इच्छुक उमेदवारांना क्यूआर कोडच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठला आवश्यक कागदपत्रांसह संबंधित रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोट
जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १३ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कंपन्या व आस्थापनांमधील ५०० हून अधिक रिक्त पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जास्तीत जास्त पात्र युवक-युवतींनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा.
- प्र.सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग