कापूस वाडगावातील प्रकार; सर्वांवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार
वैजापूर ता१८(बातमीदार) गणेशोत्सवाच्या उत्साहात मातीचा गणपती बसवून आरती केल्यानंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने तब्बल १३ चिमुकल्यांना विषबाधा झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील कापूस वडगाव येथे घडली. बिया खाल्ल्यानंतर अचानक प्रकृती खालावल्याने सर्वांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी शाळेला सुट्टी असल्याने कापूस वडगाव येथील काही मुलांनी परिसरात मातीचा गणपती तयार करून त्याची स्थापना केली. त्यानंतर सर्वांनी गणपतीची आरती केली. आरती झाल्यानंतर प्रसादासाठी काही उपलब्ध नसल्याने चिमुकल्यांनी परिसरातील एरंडाच्या बिया प्रसाद म्हणून खाल्ल्या.
एरंडाच्या बिया खाल्ल्यानंतर काही वेळातच मुलांना अस्वस्थ वाटू लागले. काहींची प्रकृती खालावल्याने पालकांनी त्यांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
विषबाधा झालेल्या मुलांची नावे
या घटनेत रोहिणी आव्हाड (१४), जयश्री आव्हाड (१८), खुशी आव्हाड (११), अंजली पवार (११), राधिका आव्हाड (१७), कैवल्या नांगरे (३), सुप्रिया त्रिभुवन (१४), साहिल आव्हाड (१८), कल्याणी आव्हाड (११), प्राची त्रिभुवन (११), आयुष त्रिभुवन (५), आर्यन त्रिभुवन (११) आणि अनुप त्रिभुवन (९) यांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, एरंडाच्या बियांचे सेवन केल्यानंतर मुलांना विषबाधा झाल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.