स्वच्छ वायू सर्वेक्षणात लातूरची दमदार कामगिरी
----
देशात सातवा क्रमांक; लातूरकरांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित
--
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ९ : स्वच्छ हवा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने लातूर महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण-२०२६ मध्ये ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत लातूरने १८८.५ गुण मिळवत देशात ७ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
शहरातील रस्त्यांवरील धूळ नियंत्रण, यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई, कचरा व जैविक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, हरित क्षेत्रात वाढ, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन तसेच नागरिकांमध्ये वायुप्रदूषणाबाबत जनजागृती या विविध उपाययोजनांचा लातूरच्या कामगिरीत महत्त्वाचा वाटा आहे.
लातूरचा राष्ट्रीय स्तरावर ७ वा क्रमांक आला आहे. वर्ष २०२४ मध्ये ३१ वा आणि २०२५ मध्ये २४ वा क्रमांक होता. ही उल्लेखनीय कामगिरी शहरातील नागरिक, स्वच्छता कर्मचारी, विविध शासकीय विभाग तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत संस्था यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे, असे मत आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
‘स्वच्छ हवा, निरोगी लातूर, हीच आपली सामूहिक जबाबदारी!’ या संकल्पनेनुसार यापुढेही शहरातील वायू गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांवर प्रभावी नियंत्रण, हरित क्षेत्राचा विस्तार, स्वच्छता व्यवस्थेचे बळकटीकरण आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यावर विशेष भर देण्यात येणार आहे, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.
-----