अँकर १
---
पावसाळा कोरडा, वाढला उन्हाचा चटका
लातूरकर घामाघूम; आता परतीच्या पावसाकडे लागले लक्ष
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ११ : यंदाच्या पावसाळ्यात लातूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असून अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. ऐन पावसाळ्यात लातूर शहर व परिसरात चक्क उन्हाचा चटका नागरिकांना जाणवत आहे. सकाळपासूनच वातावरण उष्ण होत असून दुपारच्या वेळी नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लातूरकर चांगलेच घामाघूम होत आहेत. मात्र, दुपारनंतर कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाचा शिडकावा अनुभवायला मिळत आहे.
लातूर जिल्ह्यात मागील वर्षी दमदार पाऊस झाला. पण, यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाळ्याचे जवळजवळ साडेतीन महिने संपले आहेत. मात्र, या कालावधीत दमदार पाऊस झाला नाही. त्यातच सप्टेंबर महिन्यात तापमान तुलनेने उंचावलेले असून सध्या कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हीटचा अनुभव येत आहे. गुरुवार (ता . १७) ते शनिवार (ता. १९) दरम्यान मध्यरात्री पावसाने हजेरीही लावल्याचे दिसून आले. दरम्यान, मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून लातूरकरांचे लक्ष आता परतीच्या पावसाकडे लागले आहे.
---
चौकट
गारवा हरवला, उकाडा वाढला
वातावरणातील गारवा कमी होऊन सध्या उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच दुपारच्या वेळी टोप्या, उपरणे, गॉगल, स्टॉल असे साहित्य जवळ बाळगूनच नागरिक घराबाहेर पडत आहेत. उकाड्यामुळे ऐन पावसाळ्यात पंखे, कूलर लावण्याची वेळ आली आहे. मात्र, दुपारनंतर ढगळ वातावरण तर कधी पावसाचा शिडकावा अनुभवायला मिळत आहे.