सर्वसाधारण सभांनाच अधिकारी गैरहजर
-------
गटनेत्या आशा भिसे यांच्याकडून कारवाईची मागणी ; जिल्हा परिषद प्रशासनावर अंकुश नसल्याने ही स्थिती
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ३ : ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बोलावण्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांनाच अनेक महत्त्वाच्या खात्यांचे अधिकारी सलग गैरहजर राहत आहेत. राज्य शासनाच्या अखत्यारीतील तब्बल ४३ विभागांच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहणे प्रशासकीय नियमांनुसार बंधनकारक आहे. असे असतानाही अनेक अधिकारी दांडी मारतात. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशा भिसे यांनी केली. जिल्हा परिषद प्रशासनावर कोणाचाही ठोस अंकुश उरलेला नाही, अशी टिकाही त्यांनी केली.
काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. दिनेश नवगिरे, काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या सईताई गोरे, दिपाली आदमाने, महादेव मस्के, प्रा. प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते. भिसे म्हणाल्या, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, भूवैज्ञानिक, पुनर्वसन, कामगार कल्याण, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पोलिस दलातील जबाबदार अधिकारी सभेला दांडी मारतात. स्वतः जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वारंवार नोटिसा पाठवूनही हे अधिकारी उपस्थित राहत नाहीत. यावरून जिल्हा प्रशासनाचा अधिकाऱ्यांवर कसलाही धाक राहिलेला नाही हे स्पष्ट होते.
अधिकाऱ्यांच्या अशा बेजबाबदार वृत्तीमुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. ही परिस्थिती सुधारली नाही, तर काँग्रेसचे सर्व २५ सदस्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्न मांडतील आणि वेळ पडल्यास जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन छेडतील, असा इशाराही भिसे यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतच जर कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसेल, तर ग्रामीण भागाची काय अवस्था असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गावागावांतील नादुरुस्त हातपंप युद्धपातळीवर दुरुस्त करावेत, आवश्यक मनुष्यबळ वाढवावे आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाण्याचे आरक्षण व उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणीही भिसे यांनी केली.
----