वेळेत दोषारोपपत्र दाखल, लातूर राज्यात प्रथम
पोलिसांनी ९० दिवसांत १०० टक्के दोषारोपपत्र दाखल केल्याने तपास प्रक्रियेत सुधारणा
-----
लातूर, ता. १६ : नवीन फौजदारी कायद्यानुसार गुन्ह्यांचा तपास विहित मुदतीत पूर्ण करून न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेत लातूर जिल्हा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेत जिल्हा पोलिसांनी मोठी सुधारणा केली आहे.
लातूर जिल्ह्यात १ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण ५.८१ टक्के, तर ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण ७.९५ टक्के होते. त्यानंतर १ जानेवारी २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीत हे प्रमाण अनुक्रमे १०.५५ आणि १३.४१ टक्क्यांवर पोचले.
३० जून २०२५ रोजी अमोल तांबे यांनी लातूर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेकडे विशेष लक्ष दिले. अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून तपासाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात आला. तसेच तपास अधिकाऱ्यांना विहित मुदतीत तपास पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
१ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण तब्बल ९९.८६ टक्के, तर ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण १०० टक्के झाले आहे. या कामगिरीमुळे लातूर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला आहे.
-----
प्रक्रिया गतिमान करण्यावर भर
वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेमुळे नागरिकांना तपासातील विलंबाचा सामना कमी प्रमाणात करावा लागत आहे. यापूर्वी तपास वेळेत पूर्ण न होणे, आरोपींची अटक प्रलंबित राहणे, तक्रारींची दखल न घेणे तसेच तपासात विलंब होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर तपास प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात आला आहे.
-----
कारवाईचा नियमित आढावा
जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास, दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया आणि प्रतिबंधात्मक कारवाईचा नियमित आढावा घेतला जात आहे. गुन्हा वेळेत दाखल करणे, तपास मुदतीत पूर्ण करणे, दोषारोपपत्र न्यायालयात वेळेत दाखल करणे तसेच आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर दिल्याने ही सुधारणा साध्य झाल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.