LTR26B14731
लातूर : पावसाअभावी वाळत चालले सोयाबीनचे पीक.
सोयाबीन उत्पादकांचे कंबरडे मोडले
---
पावसाअभावी केवळ लातूर जिल्ह्यात बसणार चार हजार कोटींचा फटका
--
हरी तुगावकर : सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १६ : जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश नव्हे तर दुष्काळाचीच स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीनचे हब म्हणून लातूर जिल्ह्याची ओळख आहे. पावसाअभीव हे पीक वाळून जात असल्याने उत्पादकांना किमान चार हजार कोटींचा फटका बसणार आहे. मूग, उडीद व इतर पिकेही हातून गेली आहेत. मराठवाड्यात अन्य जिल्ह्यांतही सोयाबीन हेच मुख्य पीक असून लातूरसारखीच स्थिती आहे. त्यामुळे केवळ सोयाबीनमुळे बसणाऱ्या फटक्याचा आकडा किती मोठा असेल.
जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा या पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ४५ हजार ८९५ हेक्टर आहे. त्या पैकी ४ लाख ३५ हजार ६५३ हेक्टरवर (९८ टक्के) पेरणी झाली आहे. जूनच्या सुरवातीला पाऊस न झाल्याने उशिराने पेरण्या झाल्या आहेत. त्यानंतर ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची पाठ आहे. त्यामुळे बुहतांश क्षेत्रावरचे सोयाबीन वाळून गेले आहे, काही ठिकाणी पिवळे पडले आहे. पावसाअभावी या पिकाची योग्य वाढ झाली नाही परिणामी शेंगाच लागल्या नाहीत. याचा मोठा फटका उत्पादकांना बसणार आहे. वाया गेलेले सोयाबीन पीक शेतातून बाहेर काढणेही महाग होणार आहे.
मूग, उडीद, तूरही हातची गेली
--
सोयाबीन पाठोपाठ जिल्ह्यात मुगाचे सर्वसाधारण क्षेत्र दहा हजार हेक्टरचे आहे. त्यात तीन हजार ६०३ हेक्टरवर (३६ टक्के) पेरणी झाली आहे. उडिदाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ हजार ९५४ हेक्टर असून २ हजार ६७१ हेक्टरवर (३४ टक्के) पेरणी झाली आहे. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ९१ हजार ७८६ हेक्टर असून ५९ हजार १२४ हेक्टर क्षेत्रावर (६४ टक्के) पेरणी झालेली आहे. यासह इतर पिकेही हातून गेली आहेत. यात देखील चारशे ते पाचशे कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
सोयाबीचा फटका मोठा
--
जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा मोठा आहे. सरासरी हेक्टरी १६ क्विंटल सोयाबीन निघते. जिल्ह्यात चार लाख ३५ हजार ६५३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. हेक्टरी १६ क्विंटल प्रमाणे उत्पादन गृहीत धरले तर ६९ लाख ७० हजार ४४८ क्विंटल उत्पादन अपेक्षित होते. पण सध्या हेक्टरी एक क्विंटलही उत्पादन निघेल अशी स्थिती नाही. सोयाबीनसाठी शासनाचा हमीभाव पाच हजार ८०० रुपये प्रति क्विंटल आहे. सध्या बाजारपेठेत साडेसहा हजारांपेक्षा अधिक भाव आहे. हमीभाव गृहीत धरला तरी किमान चार हजार कोटींचा फटका बसणार आहे.
बांधावर जाईना कोणी
--
जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. खरिपाचे पीक हातून गेले आहे. शासन व प्रशासन स्तरावर केवळ बैठका घेतल्या जात आहेत. पण अद्याप अधिकृत पंचनामे करा, असे आदेशच शासनाने दिलेले नाहीत. त्यात कृषी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. महसूल विभागाला शासनाने वेगवेगळी कामे लावली आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना लोकप्रतिनिधींनाही बांधावर जायला वेळ नाही. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दुष्काळ जाहीर करण्याती मागणी काही लोकप्रतिनिधी करीत आहेत.
कोट
--
पावसाअभावी लातूर जिल्ह्यात खरीप पिकांची स्थिती वाईट आहे. सोयाबीन, मूग, उडीद वाळून गेले आहे. पंचनामे करण्यासाठीही शेतात पिके नाहीत, अशी स्थिती आहे. पेरणी केलेला खर्चही निघणार नाही. दहा वर्षांनंतर पहिल्यांदा खरिपाची स्थिती दयनीय आहे. पोटाला चिमटा मारुन यंदा शेतकरी सण साजरा करीत आहे. दुष्काळी स्थितीवर तात्पुरती मलमपट्टी करून काहीच फायदा होणार नाही.
- दिनकर जाधव, माजी संचालक, कृषी विभाग
-----
१६ सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस
(मिलीमीटर)
तालुका - अपेक्षित -- पडलेला -- टक्केवारी
लातूर -- ६००.१ -- २७६.७ -- ४६.१
औसा -- ५३१.१ -- २५७.८ -- ४८.५
अहमदपूर -- ६६५.८ -- ३५४.२ --५३.२
निलंगा -- ५७५.४ -- २७५.५ -- ४७.९
उदगीर -- ६२३.६ -- ४४५.३ -- ७१.४
चाकूर -- ६७५.७ -- २९३.३ -- ४३.४
रेणापूर -- ५९३.१ -- ३०५.२ -- ५१.५
देवणी -- ५७२.४ -- २९०.७ -- ५०.८
शि. अनंतपाळ -- ५९१.५ -- २८९.५ -- ४८.९
जळकोट -- ६३६.५ -- ५४४.२ -- ८५.५
एकूण -- ६२१.५ -- ३१८.३ -- ५१.२
-----