(मिशन ॲडमिशन)
--
पाच वर्षांच्या एलएलबीसाठी
तिसऱ्या फेरीची नोंदणी सुरू
--
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : पाच वर्षांच्या एलएलबी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. नवीन उमेदवारांची नोंदणी तसेच महाविद्यालयांचा पसंतीक्रम अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. तिसऱ्या फेरीत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी पसंतीक्रम अर्ज भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
तिसऱ्या फेरीसाठी नवीन नोंदणी केलेले तसेच अद्याप प्रवेश न मिळालेले उमेदवार पसंतीक्रम अर्ज भरू शकतात. पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत सहभागी व्हायचे असल्यास ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान मागील प्रवेश रद्द करावा लागणार आहे. त्यानंतर याच कालावधीत नव्याने महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरावा लागेल. प्रवेश रद्द करण्यासाठीची लिंक संबंधित उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. तिसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---
दोन फेऱ्यांत ४,१८२ प्रवेश
पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या आतापर्यंत दोन प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या दोन फेऱ्यांमध्ये राज्यातील विधी महाविद्यालयांमध्ये ४ हजार १८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे तिसऱ्या फेरीत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे लक्ष उपलब्ध जागांकडे लागले आहे.