उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेवढा बळ देणारा होता त्यापेक्षा विरोधकांना खिंडीत पकडणारा असल्याची चर्चा होत आहे. जिल्ह्यातील विकासकामांसह आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंगही या सभेतून फुंकल्याचे दिसून आले. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकमेकांना समजून घेत पक्षकार्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षाला गरज आहे.
विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी गेली अडीच वर्षे पक्षाची चांगली मोट बांधली आहे. यातूनच महाविकास आघाडीने जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता मिळविली. मात्र, बिराजदार यांचा मृदू स्वभाव काही नेत्यांना पक्षवाढीसाठी अनुकूल वाटत नाही. त्यामुळे पुढील काळात बिराजदार यांना पुन्हा संधी मिळणार की अन्य नेत्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व जाणार याची चाचपणी दौऱ्यात पवार यांनी केली. जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी माजी आमदार राहुल मोटे यांनाही होती. मात्र, गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना न दुखावता स्वतःच्या मतदारसंघाबाहेर जाण्याचे टाळल्याने त्यांची संधी हुकली असल्याचे बोलले जात आहे. राजकारणात पुढे येण्यासाठी काही ठिकाणी, प्रसंगी लवचीक भूमिका घ्यावी लागते.
मात्र, पक्षाचे जिल्हास्तरीय नेते कुठेही अशी भूमिका स्वीकारताना दिसत नाहीत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला निर्णयक्षम आणि भक्कम नेत्याची गरज आहे. कार्यकर्त्यांची मोट बांधणारे नेतृत्व जिल्ह्याला आगामी काळात गरजेचे असल्याचा संदेश पवार यांच्यापर्यंत पोचला होता. सध्या जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत प्रतापसिंह पाटील, संजय निंबाळकर, संजय पाटील दुधगावकर, अशोक जगदाळे, सक्षणा सलगर यांचीही नावे आहेत. सुरेश पाटील यांना वरिष्ठस्तरावरील पद मिळाले आहे. काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्याकडे मात्र जिल्ह्यात नेतृत्व आहे. ऐनवेळी जर स्वतंत्र लढावे लागले तर पक्षात एकहाती सक्षम नेतृत्व असावे, याची चाचपणी श्री. पवार यांनी यावेळी केली. जिल्ह्यातील काही नेत्यांकडे आर्थिकबळ असले तरीही त्यांना अन्य जिल्हास्तरीय नेत्यांना एकत्र करता आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात पक्षनेतृत्वाची कायम कोंडी होत आहे. अखेर श्री. पवार यांनी रविवारी जिल्हा दौऱ्यात एकाच दगडात अनेक डाव साध्य केले आहेत.
कार्यकर्ता मेळावा आणि विविध विकास कामांचे लोकार्पण पाडोळी येथे झाले. हा भाग तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आहे. आणि याच मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडेच पक्षाचे जिल्ह्यातील सर्वाधिकार होते. मात्र, डॉ. पाटील आणि आमदार पाटील या दोघांचेही जिल्ह्यातील वर्चस्व कमी झाल्यानंतर समीकरणे बदलली. आमदार पाटील भाजपमध्ये गेले. त्यांच्या भाजप प्रवेशाने श्री. पवार आक्रमक झाले होते. विधानसभा निकालानंतर झालेल्या घडामोडीत महाविकास आघाडी अस्तित्वात आली. सत्तेची मोट बांधण्यात श्री. पवार यांची प्रमुख भूमिका होती. महाविकास आघाडी सत्तेवर येताच कोरोनामुळे दोन वर्षांचा कार्यकाळ निघून गेला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर झालेली श्री. पवार यांची मराठवाड्यातील पहिलीच सभा होती. पवारांच्या यापूर्वीच्या प्रत्येक सभेत पाटील पिता-पुत्र त्यांच्यासोबत असायचे. पण, विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील भाजपमध्ये गेलेल्या संतापाची परतफेड थेट त्यांच्या मतदारसंघात जाऊन ‘इथे येऊन तुमच्याशिवाय जंगी सभा होऊ शकते’ असा संदेशच श्री. पवार यांनी यावेळी दिल्याची चर्चा कार्यकर्ते करीत होते.
सलगर यांच्याकडे नेतृत्व जाणार का?
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या आग्रहाने श्री. पवार जिल्ह्यात आले. सलगर यांच्या पाडोळी जिल्हा परिषद गटातील कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. एवढ्या लहान कार्यक्रमाला शरद पवार येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य अन् कुतूहलही होते. ही बाब खासदार श्री. पवार यांच्याही लक्षात आल्याने त्यांनी जाहीर सभेत याबाबात खुलासा केला. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले. सावित्रीबाईंच्या विचाराने स्त्री-शिक्षणाची बीज रोवले गेले. रमाबाईमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना बळकटी आली, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे यातून अप्रत्यक्षरीत्या त्यांनी सलगर यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व देणाची सूतोवाच तर केली नाही, अशी चर्चा आहे.