National Tourism Day : पर्यटकांची पावले शहरात थांबणार कधी? धोरण ठरतेय ‘२० साल बाद!’

छत्रपती संभाजीनगर शहरात देश-विदेशातून दरवर्षी सुमारे २४ लाख ४१ हजार पर्यटक येतात. वेरूळ, अजिंठा लेणींसह काही ठरावीक पर्यटनस्थळे पाहून हे पर्यटक शहरातून काढता पाय घेतात.
Verul Ajintha Caves
Verul Ajintha Cavessakal

- ९९२३००१८४८

शहरात देश-विदेशातून दरवर्षी सुमारे २४ लाख ४१ हजार पर्यटक येतात. वेरूळ, अजिंठा लेणींसह काही ठरावीक पर्यटनस्थळे पाहून हे पर्यटक शहरातून काढता पाय घेतात. पर्यटकांनी शहरात मुक्काम करावा, परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी द्याव्यात, त्यांच्यासाठी नाइट लाइफ असावे.

याविषयी अनेक वर्षांपासून केवळ कागदी घोडे नाचविले जात असून, २० वर्षांच्या चर्चेनंतर महापालिकेने आता कुठे स्वतंत्र पर्यटन विभाग सुरू केला. या विभागामार्फत पुढील दहा वर्षांसाठी पर्यटन धोरण तयार केले जात असून, त्यातून तरी शहरातील पर्यटनाला चालना मिळणार का? असा प्रश्‍न उपस्‍थित केला जात आहे.

राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात मोठ्या संख्येने पर्यटनस्थळे आहेत. मात्र ही पर्यटनस्थळे अद्यापही दुर्लक्षितच आहेत. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणींसह जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे पाहण्यासाठी २०२३ मध्ये सुमारे २४ लाख ४१ हजार पर्यटक आल्याची नोंद आहे.

त्यात देशातील पर्यटकांची संख्या २४ लाख २२ हजार ४९२ तर १८ हजार ६६९ विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. हा आकडा केवळ वेरूळ लेणींचा आहे. पण, हे सर्वच पर्यटक इतर पर्यटनस्थळांकडे वळलेले नाहीत. त्यातल्या त्यात शहरातील पर्यटनस्थळे तर दुर्लक्षितच आहेत.

एवढेच काय महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या १२ ते १५ लाखांच्या घरात असताना या पर्यटकांनाही छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, नहरी, ऐतिहासिक दरवाजे, महल यासह इतर पर्यटनस्थळांची माहिती देखील नसते. महापालिकेनेच शहरातील पर्यटनाकडे दुर्लक्ष केले. शहरातील पर्यटनवाढीवर गेल्या २० वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे.

शहरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला परिसरातील पर्यटनाची माहिती व्हावी, यासाठी महापालिकेत पर्यटन विभाग कार्यरत नव्हता. विद्यमान प्रशासक जी. श्रीकांत यांनी पर्यटन या विषयाकडे विशेष लक्ष दिल्यानंतर पर्यटन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

या विभागामार्फत पुढील पाच वर्षांसाठी धोरण ठरविले जात असून, त्यात प्रत्येक पर्यटकापर्यंत पर्यटनस्थळांची माहिती पोचविणे, विमानतळापासून, प्रत्येक हॉटेलमधून पर्यटनस्थळांपर्यंत कसे पोचायचे? कोणाला संपर्क साधायचा? गाइडची संख्या कशी वाढवायची? पर्यटनक्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना एकत्र आणणे यासह इतर बाबींचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शहरातील पर्यटनास चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अनेक योजना कुचकामी

महापालिकेचे तत्कालीन प्रशासक निपुण विनायक यांनी शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन केंद्र सुरू केले होते. रेल्वेस्टेशन रोडवर जून २०१६ मध्ये तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते या माहिती केंद्राचे थाटात उद्घाटन करण्यात आले.

त्यात विद्यापीठातील पर्यटन विभागाच्या विद्यार्थ्यांची ठरावीक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली होती, मात्र २० महिन्यांतच पर्यटन कक्षाला घरघर लागली. तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता ऐतिहासिक टाउन हॉलमध्ये सायंकाळच्या वेळी पर्यटकांसाठी कला दर्शनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. पण, ही संकल्पना कागदावरच राहिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com