मॅग्नेटमधून शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदान
---
बीड, ता. १६ : महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँकेच्या संयुक्त अर्थसाह्याने राज्यात राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पातील विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेतमालाचे मूल्यवर्धन करणे, काढणीपश्चात नुकसान कमी करणे आणि ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, ही प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
मॅग्नेट प्रकल्पात सीताफळ, पेरू, केळी, स्ट्रॉबेरी, संत्रा, डाळिंब, चिकू, मोसंबी, हिरवी व लाल मिरची, भेंडी, आंबा, काजू, लिंबू, पडवळ तसेच विविध फुलपिकांचा समावेश आहे. या पिकांच्या मूल्यसाखळ्या टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येत आहेत. प्रकल्पातील बाजाराभिमुख उत्पादनवाढ व उत्पादकता सुधारणा उपघटकाअंतर्गत ग्लोबलगॅप प्रमाणपत्र, कीटकनाशक अंश तपासणी, ‘फ्रूट केअर प्रॅक्टिसेस’ (विशेषतः केळीसाठी) आणि सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत थेट अनुदान दिले जात आहे. लातूर, बीड, धाराशिव व नांदेड जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्रे व कृषी विद्यापीठांनी योजनेचा लाभ घ्यावा. पात्र संस्थांनी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आवाहन मॅग्नेट प्रकल्पाच्या लातूर प्रकल्प उपसंचालकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी लातूर येथील मॅग्नेट प्रकल्पाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.