खरिपात १ हजार १० कोटींचे पीक कर्ज वाटप
छत्रपती संभाजीनगर, ता. १ ः जिल्हाभरातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी १ हजार ५९७ कोटी रुपये वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी अद्यापपर्यंत १ हजार १० कोटी ४६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती सोमवारी (ता.३१) प्रशासनातर्फे देण्यात आली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४९० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ५२२ कोटी ५ लाख रुपयांचे कर्जवाटप (१०७ टक्के) केले. राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँकांनी ८७७ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी ३८१ कोटी ११ लाख रुपये, तर ग्रामीण बँकेने २३० कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी १०७ कोटी ३० लाख रुपयांचे कर्जवाटप केल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
याशिवाय २०२६-२७ मध्ये जिल्ह्यासाठी खरीप व रब्बी हंगाम मिळून २ हजार ४०० कोटी रुपयांच्या पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी खरीप हंगामासाठीचे १ हजार ५९७ कोटी रुपये, तर रब्बी हंगामासाठी ८०३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी सोमवारी (ता.३१) या पीक कर्ज वाटपासह त्यातील अडचणींचा आढावा घेतला. पीक कर्जवाटपाचे निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व बँकांनी पुढाकार घ्यावा, तसेच पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज प्रस्तावांवर तत्परतेने कार्यवाही करून कर्जवाटपाला अधिक गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील कर्ज प्रस्तावांचाही बँकनिहाय आढावा घेत पात्र प्रस्तावांवर सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा. युवकांना उद्योग व स्वयंरोजगारासाठी आवश्यक अर्थसाहाय्य वेळेत उपलब्ध होईल, यासाठी बँका आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.
-------------------