पावणेदोन लाख शेतकऱ्यांना ‘कर्जमुक्ती’चा दिलासा
३४ हजार ७ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यात २८९.७२ कोटी रुपये जमा
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ८ ः राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७० हजार ते १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना १ हजार ४०० कोटी रुपयांपर्यंतचा मोठा दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जिल्ह्यातील ३४ हजार ७ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर २८९ कोटी ७२ लाख ४४ हजार ६६० रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी थकीत कर्जाच्या पाशातून मुक्त झाले असून त्यांना नव्याने पीककर्ज घेण्यास पात्र ठरवण्यात आले आहे.
एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदत पीककर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे. २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठी ओटीएस योजना असून, ३१ मार्च २०२७ पूर्वी २ लाखांवरील रक्कम भरल्यास उर्वरित २ लाखांचा लाभ शासन देणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
४६,९१५ शेतकऱ्यांची पहिली यादी
पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी ३९ हजार ३२७ शेतकऱ्यांनी ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून, त्यांना साधारणतः ३५० कोटींचा लाभ वितरीत होत आहे.
१४०० कोटींच्या लाभाचे नियोजन
पुढील टप्प्यांमध्ये जिल्ह्यातील आणखी सुमारे ५० हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार असून त्यांना ६०० ते ६५० कोटी रुपयांचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या सुमारे ९० हजार ते १ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभापोटी ४०० ते ४५० कोटी रुपये मिळतील. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण पावणेदोन लाख शेतकऱ्यांना १ हजार ४०० कोटी रुपयांचा आर्थिक आधार मिळणार आहे.
..........
((कोट))
या घटकांना योजनेतून वगळले
आजी-माजी लोकप्रतिनिधी (खासदार, आमदार, जि. प. सदस्य, नगरसेवक), साखर कारखाने व सहकारी बँकांचे संचालक तसेच २५ हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन/निवृत्तीवेतन घेणारे अधिकारी-कर्मचारी आणि शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणारे शेतकरी यांना या कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आले आहे.