रस्त्याचे निकृष्ट काम, शेतकरी
संघटनेचा रास्ता रोकोचा इशारा
-----
केज, ता. ९ (बातमीदार) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा वर्षभरातच उघडा पडला. डांबर उखडून गिट्टी उघडी पडल्याने या कामांची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले, केज तालुक्यातील चंदनसावरगाव-जवळबन-सावळेश्वर-आवसगाव आणि जवळबन-लाडेगाव रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी झाले. या दोन्ही रस्त्यांवरील डांबरीकरणाचे थर उखडून गिट्टी उघडी पडली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर हाताने निघत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या रस्त्याचे काम करणाऱ्या सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन व राज कन्स्ट्रक्शन या कंपन्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करपे यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी पुढील आठ दिवसांत प्रशासनाने ठोस चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही, तर १७ सप्टेंबर २०२६ रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी अंबाजोगाई-कळंब महामार्गावरील सावळेश्वर येथे ग्रामस्थांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे.