‘महावितरण’च्या वेळापत्रकाने शेतकऱ्यांची कोंडी
रात्री पावणेदहा ते पहाटे साडेतीनपर्यंतच वीज; त्यातही वारंवार खंडित पुरवठा
हिंगोली, ता. १० (बातमीदार) : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली असतानाच ‘महावितरण’कडून कृषिपंपांसाठी करण्यात आलेले आठवड्याचे रोटेशन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रात्री पावणेदहा ते पहाटे साडेतीन या कालावधीत वीजपुरवठ्याचे वेळापत्रक असले तरी प्रत्यक्षात या कालावधीतही काही तासच वीज उपलब्ध होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे.
सध्या सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध खरीप पिकांची वाढ, उत्पादनाच्या दृष्टीने पाण्याची आवश्यकता आहे. अनेक भागांत पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने शेतकऱ्यांची भिस्त विहीर, बोअर, कृषिपंपांवर आहे. वीजपुरवठ्याचे वेळापत्रक प्रतिकूल असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे निर्धारित वेळेतही वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने कृषी पंप सुरू करण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागत आहेत. अनेकदा वीज येण्याची वाट पाहत शेतकऱ्यांना रात्री उशिरापर्यंत शेतात थांबावे लागत आहे. त्यामुळे वेळ, श्रम, खर्च वाढत असून पिकांना मात्र अपेक्षित पाणी मिळत नाही. पिके शेंगा व दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असताना पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच पावसाच्या अनिश्चिततेमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता वीजपुरवठ्याचे संकट उभे राहिले आहे.
महावितरणने कृषी पंपांसाठीचे रोटेशन शेतकऱ्यांच्या गरजेनुसार अधिक सोयीचे करावे, रात्रीच्या ऐवजी शक्य तितका दिवसा वीजपुरवठा करावा, निर्धारित वेळेत अखंडित वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पिके वाचविण्यासाठी सध्या पाण्याची नितांत गरज असताना वीजपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास खरीप हंगामातील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-----------------------------------------------------
फोटोसह ABD26J79061
शेवाळा ः देवजना येथे सैनिक ओमप्रकाश कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर.
-----------
देशसेवेहून गावी परतलेले सैनिक
ओमप्रकाश कल्याणकरांचा सत्कार
शेवाळा ः देवजना येथील रहिवासी ओमप्रकाश परभराव कल्याणकर हे १५ वर्षे भारतीय सैन्य दलात नोकरी करून परतल्यावर त्यांचा गावात ग्रामस्थांतर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. कल्याणकर हे २०११ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. त्यांनी सुरवातीला जम्मू-काश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम सीमेवर सेवा बजावली. शेवाळा, देवजना ग्रामस्थांतर्फे फटाक्यांच्या आतषबाजीने ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. देवजना प्राथमिक शाळेसमोर ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गोपू पाटील, अभय पाटील, बालू पाटील, रूपेश पाटील, पप्पू सावंत, अतुल गांजरे, अक्षय सावंत, शिक्षक रामराव सावंत, चंचल आबा कल्याणकर, बालाजी कल्याणकर, भाऊराव कल्याणकर, रामराव कल्याणकर, उमाजी चोपडे, वाघमारे, कैलास कल्याणकर, प्रशांत शिंदे, रोहिदास धोत्रे, विठ्ठल कल्याणकर, साहेबराव कल्याणकर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
((चौकट)))
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणार
भारतीय सैन्यात पंधरा वर्षे सेवा बजावून परत गावात आल्याने जुन्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. उर्वरित आयुष्यात गाव परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणार असल्याचे सैनिक ओमप्रकाश कल्याणकर यांनी सांगितले.