मराठवाड्यातून तेराशे बस कोकणात
--
गणेशोत्सव ः स्थानिक पातळीवरील अनेक फेऱ्या रद्द होणार
---
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ११ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी मुंबई, ठाणे, पुणे आदी भागांतून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शेकडो जादा बस सोडण्यात आल्या आहेत. पुरेशा बस उपलब्ध व्हाव्यात म्हणून महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाने तब्बल १ हजार ३०० जादा बस पुरविण्याचा निर्णय घेतला असून अनेक बस रवानाही झाल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यातून धावणाऱ्या सुमारे २९ लाख किलोमीटरच्या फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत. परिणामी, ग्रामीण तसेच लांब पल्ल्याच्या प्रमुख मार्गावर धावणाऱ्या बससेवा विस्कळित होणार असून प्रवाशांची गैरसोय होणार आहे. कोकणासाठी पुरविलेल्या बस आपापल्या आगारात परतेपर्यंत वेळापत्रक विस्कळितच रहाण्याची शक्यता आहे.
कोकणातील असंख्य चाकरमाने मुंबई, ठाणे, पुणे भागात आहेत. कोकणात घरगुती गणेशोत्सव प्रसिद्ध असून तो मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. त्यासाठी चाकरमाने आपल्या गावी आवर्जून जातात. त्यांच्यासाठी एसटी महामंडळ, रेल्वेला नियोजन करावे लागते. नियमित एसटी बसपेक्षा कितीतरी पटीने जादा बस सोडाव्या लागतात. शेकडो बस पुरविण्यासाठी महांडळाला इतर आगारांची मदत घ्यावी लागते. त्यानुसार महामंडळाच्या मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या व्यवस्थापक अनघा बारटक्के यांनी नियोजन केले आहे. मराठवाड्यातून १३०० बस मुंबई-ठाण्याकडे पाठविण्यात येत असल्याने मराठवाड्यातील विविध विभागाअंतर्गत ग्रामीण भागात तसेच लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या गाड्या ३० ते ५० टक्के कमी करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
.....
बसचा असा पुरवठा
---
विभाग -- बस पाठवणार
बीड ३१०
छत्रपती संभाजीनगर ३०७
धाराशिव २०८
लातूर २०५
जालना १२०
परभणी ११०
नांदेड ४०
एकूण १,३००
फेऱ्या अशा रद्द होणार
विभाग -- किलोमिटर
छत्रपती संभाजीनगर ९,३५,०००
बीड ८,२५,०००
लातूर ६६,०००
नांदेड १,३१,०००
धाराशिव ५,०००००
परभणी ४,७५,०००
एकूण २९,३२,०००
........
महत्त्वाच्या बाबी
--
- जालना विभागातून सोडण्यात येणाऱ्या १२० बसपैकी २५ बससाठी जळगाव विभागाचे चालक
- वाहतूक आदेशाच्या तत्काळ अंमलबजावणीसाठी मध्यवर्ती कार्यालय मुंबई, नाशिक आणि नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.