अतिक्रमणाच्या नोटिसांनी मठपिंपळगावात खळबळ
अंबड, ता. १२ (बातमीदार) ः मठपिंपळगाव येथील अनेक ग्रामस्थांना सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबड यांच्याकडून रस्त्यालगतच्या अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावण्यात आल्याने गावात खळबळ उडाली आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली आपली घरे पाडली जाणार का? या चिंतेने अनेक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवाईपूर्वी वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबड यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, विभागाच्या नोटिसीत राष्ट्रीय महामार्ग २२५ ते लोणार-भायगाव-मठपिंपळगाव रस्ता (प्रजिमा-१७) या मुख्य रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना १५ मीटर, म्हणजेच एकूण ३० मीटर रुंदीची जागा महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ मधील कलम २० तसेच १९ एप्रिल १९६७ च्या शासन निर्णयानुसार शासकीय जागा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटरच्या आत अनधिकृत अतिक्रमण झाल्याचे नोटिसीत सूचित करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. निवेदनावर प्रा. मेश गाढे, अशोक घुले, कडुबा घुले, रमेश घुले, करण घुले, रावसाहेब सोनवणे, रामकौर सोनवणे, राजू ढिल्पे, वनाबाई ढिल्पे, करण ढिल्पे, दत्ता ढिल्पे, सूरज घुले, बळिराम ढिल्पे, पंढरीनाथ ढिल्पे, मोहन ढिल्पे, कमलबाई सोनवणे, रवींद्र ढिल्पे, भीमराव ढिल्पे, रमेश घुले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.