धूर फवारणीअभावी डासांचा प्रादुर्भाव
केदारखेडा, ता.१८ (बातमीदार) : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात सध्या वाढलेले ऊन, दमट हवामान आणि अधूनमधून जाणवणारी थंडी यामुळे वातावरणात बदल झाला आहे. त्यातच गावात नियमित धूर फवारणी होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी ताप, सर्दी तसेच विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असताना धूर फवारणीची जबाबदारी नेमकी कोणाची, यावरून आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायतीकडून एकमेकांकडे बोट दाखविले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.गावात डासांचे प्रमाण वाढले असतानाही वेळेवर धूर फवारणी होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावात डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक व सेविकांकडून जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. डासांची उत्पत्तीस्थळे शोधून त्यावर उपाययोजना करणे, नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणे आणि संशयित रुग्णांची माहिती घेणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. दरम्यान, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता ग्रामपंचायतीने तातडीने धुरफवारणीचे नियोजन करावे, गावातील डासांची उत्पत्तीस्थळे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तसेच आरोग्य विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
.....
गव्हाण-संगमेश्वरमध्ये डेंगीसदृश रुग्ण
गव्हाण-संगमेश्वर येथे डेंगीसदृश लक्षणे असलेल्या काही रुग्णांनी जालना येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी गव्हाण-संगमेश्वर येथे धूर फवारणी करण्यात आल्याचेही सांगण्यात येते.