जिल्ह्यात १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत
------
प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली काढली जाणार
------
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २ ः आपापसातील कायदेशीर वाद आणि खटले समोपचाराने मिटवून नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक ताण-तणाव वाचवण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरण (सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली) व महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरणाच्या (मुंबई) निर्देशानुसार, जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी (ता. १२) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित, तसेच दाखलपूर्व विविध प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक आणि वाद-विवादाची प्रकरणे, दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले, वीज वितरण कंपनी आणि बँकांशी संबंधित प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणे समोपचाराने निकाली काढण्यात येणार आहेत.
न्यायालयीन शुल्क होणार परत
लोकअदालतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात प्रकरण तडजोडीने आणि आपापसातील संमतीने मिटविल्यास संबंधित पक्षकारास त्यांनी भरलेले न्यायालयीन शुल्क नियमानुसार परत मिळते. याशिवाय दोन्ही पक्षांमधील कटूता संपून सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतात.
----
असे साधा संपर्क
आपली प्रकरणे या लोकअदालतीत ठेवण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांनी जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधिसेवा प्राधिकरण, धाराशिव किंवा आपापल्या संबंधित तालुका विधिसेवा समिती येथे संपर्क साधावा. पक्षकारांनी यासाठी आपल्या वकिलांशीही चर्चा करावी, असे सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिक, पक्षकार आणि व्यावसायिकांनी या राष्ट्रीय लोकअदालतीचा अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव, सचिव तथा दिवाणी न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.