‘खेलेगा भारत, जितेगा भारत’च्या घोषणांनी नांदेड दणाणले
----
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ४५० खेळाडूंचा सामुदायिक रॅलीत सहभाग
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. २ : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या घोषवाक्यासह आयोजित सामुदायिक रॅलीत सुमारे ४५० खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन तसेच विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
२९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली. सायंकाळच्या सत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देत जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर खेळात प्रगती साधण्याचे आवाहन केले. विजय मिळाल्यानंतर विनम्र राहावे, तर पराभवानंतर अधिक मेहनतीने पुन्हा मैदानात उतरावे, असा संदेश त्यांनी दिला. नागरिकांनीही दररोज किमान एक तास खेळ आणि फिटनेससाठी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नांदेड कॅम्पचे पोलिस निरीक्षक प्रशांत राठोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, किशोर पाठक, नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. इम्तियाज खान, उपाध्यक्ष विनोद गोस्वामी, सचिव रवी बकवाड, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर आदी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांच्या नेतृत्वात कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले, तर आभार संजय बेतीवार यांनी मानले.
----
४५० खेळाडूंची सामुदायिक रॅली
राष्ट्रीय क्रीडा दिन सप्ताहानिमित्त ३० ऑगस्ट रोजी सकाळी सामुदायिक रॅली काढण्यात आली. विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू, प्रशिक्षक, एकनाथ पाटील अकॅडमीचे प्रतिनिधी तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे ४५० जणांनी रॅलीत सहभाग घेतला. ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.