५२ गावांत ‘एक गाव, एक गणपती’;
१२५ ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना
-----
चाकूर, ता. १६ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १०६ गावांत सोमवारी (ता. १४) १२५ ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. विशेष म्हणजे, ५२ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवत एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
चाकूर तालुक्यासह रेणापूर व अहमदपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. या गावांतील १२५ गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक परवाने घेतले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांना विविध सूचना दिल्या आहेत. परवानगी न घेता गणेशाची प्रतिष्ठापना केलेल्या मंडळांनी परवाना काढून घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका, आरती, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विसर्जनावेळी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवेदनशील ठिकाणे, प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच विसर्जन मार्गावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी नऊ अधिकारी, ४५ पोलिस कर्मचारी आणि ५० होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे आणि धार्मिक कार्यक्रमांना प्राधान्य देत अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
-----
सामाजिक उपक्रमांमुळे एकोपा
सामाजिक उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढण्यासही मदत होत आहे. पोलिस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावांतील पोलिस अंमलदारांना गणेश मंडळांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.