ग्राऊंड रिपोर्ट...
फोटोसहABD26J79058, ABD26J79059,
पालम ः पेठशिवणी शिवारातील पप्पू वाडेवाडे यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक अक्षरशः वाळून गेले. (दुसऱ्या छायाचित्रात) शेखराजूर येथील हनुमंत देशमुख यांचे कपाशीचे पीक कोमेजले आहे.
-----------
मागील वर्षी अतिवृष्टीने; यंदा आवर्षणाने डोळ्यांत पाणी
-------------------------------
पालम तालुक्यातील चित्र; पावसाच्या दीर्घ डीमुळे पिके कोमेजली
मारोती नाईकवाडे
पालम, ता. १० ः मागील वर्षी अतिवृष्टीने खरीप हातचे गेले तर यंदा यंदा पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. निसर्गाच्या अवकृपेने यंदा हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत हिरावला जात आहे. त्यामुळे नाऊमेद झालेल्या शेतकऱ्यांनी शेताकडे पाठ फिरवली आहे.
पालम तालुका हा दोन भागांत विभागाला आहे, एक भाग सुपीक तर दुसरा भाग डोंगराने व्यापला आहे. अशात मागचे वर्ष ओले, यंदाचे कोरडे गेले. मागील वर्षी ऐन खरिपात ढगफुटीसदृश पाऊस आणि अतिवृष्टीने शेतातील पिके वाहून गेली. जमिनी खरडून निघाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या संकटातून सावरत शेतकऱ्यांनी यंदा कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन, सावकाराचे उंबरठे झिजवून नव्या आशेने खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र पावसाने ऐन खरिपात दीर्घ ओढ दिली. सुरवातीस लावलेल्या हजेरीनंतर पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ ताणामुळे उभ्या पिकांनी माना टाकल्या. नदी-नाले कोरडेठाक असून विहिरी, कूपनलिकांच्या (बोअरवेल) पातळीही उन्हाळ्यासारखी खालावल्याने पिकांना पाणी देणेही अशक्य आहे. खरीप पिकांची अवस्था पावसाअभावी दरनीय असून सोयाबीनची फुले गळून पडत आहेत, तर कापसाची वाढ खुंटली आहे. अनेक भागांत उशिरा झालेल्या पेरण्या वाया गेल्या असून, आता दुबार पेरणी करायची तरी कशी आणि भांडवल कुठून आणायचे, असा सवाल शेतकरी विचारत आहेत, महागडी खते, बियाणे वापरून लावलेली पिके डोळ्यांदेखत वाळून जात आहे.
((कोट)))
गेल्या वर्षी अतिवृष्टीने पिके वाहून गेली म्हणून डोळ्यांत पाणी आले, यंदा पाऊस पडत नाही म्हणून डोळ्यांत पाणी आहे. दरवर्षी खते, बियाणे, मजुरीचा खर्च वाढतोय, मात्र उत्पन्न शून्य आहे. आता कर्ज कसे फेडायचे, कुटुंब चालवायचे कसे? म्हणूनच शेतात जायचीही हिंमत उरलेली नाही.
-हनुमंतराव देशमुख, शेतकरी
----------
((कोट)))
निसर्गाच्या लहरीपणामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पार कोलमडून गेली आहे. बँकेचे हप्ते, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या चिंतेने शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे.
-चंद्रकांत गायकवाड, शेतकरी
--------------
((फोटो)))
पावसाच्या दीर्घ दडीने
खरिपाच्या पिकांचे मातेरे
जवळा पांचाळसह परिसरात वास्तव
---------------
अविनाश उदगीरे
जवळा पांचाळ, ता. १० ः कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ परिसरात सलग दीड महिना पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
एल निनोच्या प्रभावामुळे ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे वातावरण असून, जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे शेंगा लागलेले सोयाबीन, इतर पिके डोळ्यांसमोर करपत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जवळा पांचाळ परिसरातील वडगाव, रेडगाव, डिग्रस, सालापूर, वसफळ, गुंडलवाडी आदी गावांमधील पिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. जमिनीत ओलावा न उरल्यामुळे पिके मान टाकू लागली आहेत.
((कोट))))
आम्ही कर्जाऊ पैसे घेऊन, दागिने मोडून सोयाबीनची पेरणी केली. पिकास शेंगाही लागल्या होत्या; पण दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने हाताशी आलेले पीक डोळ्यांसमोर जळून चालले आहे. आता शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी."
-अविनाश हामदे,
शेतकरी, डिग्रस बु.
((कोट)))
पावसाअभावी जमिनीला उन्हाळ्यासारख्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. पेरणीसाठी झालेला खर्च तर सोडाच, पण यंदा खतांचा, बियाण्यांचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे संसार कसा चालणार, याची चिंता सतावत आहे.
-मोबीन पटेल, शेतकरी,
जवळा पांचाळ
((कोट)))
यंदा पावसाने सुरवातीला चांगली साथ दिली होती, त्यामुळे पिके जोमात होती; पण नेमक्या ऐन वाढीच्या, शेंगा भरण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने उरलीसुरली आशाही मावळली आहे. शासनाने पंचनामे करून तातडीने पीकविमा, हेक्टरी भरपाई द्यावी.
-आनंद साले, शेतकरी, जवळा पांचाळ