(लीड)
‘अप-डाऊन’ने नागरिकांच्या कामांना बसतोय खो!
परतूर नगरपालिकेतील प्रकार; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थितीने हेलपाटे वाढले
परतूर, ता. ४ (बातमीदार) : येथील नगरपालिकेत पूर्णवेळ अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने, तसेच काही कर्मचारी नियमितपणे ‘अप-डाऊन’ करत असल्याने नागरिकांची विविध कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थितीचा परिणाम नगरपालिका कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजावर होत असून, विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र आहे.
नगरपालिकेत जन्म-मृत्यू दाखले, बांधकाम परवानगी, मालमत्ता कर, पाणीपुरवठा, विविध प्रमाणपत्रे तसेच अन्य प्रशासकीय कामांसाठी नागरिकांची दररोज वर्दळ असते. मात्र, संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्यास नागरिकांना कामासाठी पुन्हा-पुन्हा नगरपालिका कार्यालयात यावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा वाया जात असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ‘अप-डाऊन’मुळे कार्यालयीन कामकाजात विलंब होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महत्त्वाच्या पदांवरील अधिकारी कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहणे अपेक्षित असताना त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक कामे प्रलंबित राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहतील, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
.................
...तर दाद मागायची कुणाकडे?
नगरपालिका ही नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. विविध कामांसाठी नागरिक नगरपालिका कार्यालयात येतात. मात्र, संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध नसल्यास त्यांना आपल्या कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत प्रशासनाने स्पष्ट नियम व वेळापत्रक निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी उपलब्ध नसतील, तर नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
.............
बायोमेट्रिक उपस्थितीनुसार वेतन काढावे
नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य करून त्याच आधारे त्यांचे वेतन काढण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बायोमेट्रिक नोंदीची नियमित तपासणी करून कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी. केवळ हजेरी लावून कार्यालयाबाहेर राहण्याच्या प्रकारालाही आळा घालण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थितीची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.