

Railway Mismanagement Exposed on Ahilyanagar–Beed Section
Sakal
-नितीन चव्हाण
बीड : कोणत्याही रेल्वे प्रवासात ‘सुरक्षा’ हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. रेल्वे क्रॉसिंगवर जर अधिकृत कर्मचारी नसेल, तर तिथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार केवळ विसंगत नसून, तो रेल्वे प्रवासी आणि रस्त्यावरील वाहनधारक या दोघांच्याही जिवाशी खेळणारा आहे. रेल्वे क्रॉसिंगवर वाहने थांबवून रेल्वेला मार्ग दिला जातो, हा नियम आहे. मात्र, बीड शहरातील चहाटा रोड रेल्वे क्रॉसिंगवर चित्र पूर्णपणे उलटे आहे. येथे रेल्वेलाच आधी थांबावे लागते. कर्मचारी नियुक्त नसल्याने रेल्वेचालकाला खाली उतरून स्वतः फाटक बंद करावे लागते आणि रेल्वे पुढे नेल्यानंतर पुन्हा उतरून फाटक उघडावे लागते. रेल्वे प्रशासनाच्या या अजब आणि धोकादायक नियोजनावर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.