६५० पोलिसांच्या बदल्यांना
गृह विभागाचा लेखी पाठिंबा
-----
बीड, ता. २ : जिल्हा पोलिस दलातील प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शकता कायम राखण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत कॉँवत यांनी केलेल्या ६५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयाला आता राज्याच्या गृह विभागाने लेखी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) १७ कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर, त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यास गृह विभागाने बीड पोलिसांना अधिकृत परवानगी दिली आहे.
अनेक वर्षांपासून एकाच तालुक्यात, पोलिस ठाण्यात किंवा बीटमध्ये कार्यरत असलेल्या ६५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांविरोधात ३५ कर्मचाऱ्यांनी मॅटकडे धाव घेतली होती. त्यापैकी १८ प्रकरणांत पोलिस प्रशासनाची बाजू मान्य करण्यात आली; तर १७ कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर हे प्रकरण गृह विभागाकडे गेले. संबंधित कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी घेतलेला निर्णय प्रशासकीयदृष्ट्या योग्य आणि नियमांच्या चौकटीत असल्याची भूमिका घेत गृह विभागाने उच्च न्यायालयात अपील करण्यास परवानगी दिली. गृह विभागाच्या या निर्णयानंतर बीड पोलिसांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. या घडामोडीनंतर काही संबंधित कर्मचाऱ्यांनी पोलिस अधीक्षक नवनीत कॉँवत यांची भेट घेऊन बदलीच्या निर्णयाबाबत नरमाईची भूमिका घेतली.
-----
जिल्हा पोलिस दलात शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे हाच मुख्य उद्देश आहे. प्रशासकीय हित लक्षात घेऊन बदल्या करण्यात आल्या. शासनानेही निर्णयाची सुयोग्य पडताळणी करून पाठिंबा दिला आहे. पोलिस दल नेहमी जनहितासाठी आणि शिस्तीसाठी कटिबद्ध असून या प्रक्रियेमुळे कारभारात अधिक सुधारणा होईल.
-नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड