((MKN26A00797))
माकणी : भारत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रितेश भगत याचा सत्कार करण्यात आला.
..................
माकणीच्या प्रितेश भगत याची निवड
माकणी : भारत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी प्रितेश संतोष भगत यांची पुणे येथील नामांकित आयटी कंपनीत (फेज-३) ‘प्रोसेस एक्झिक्युटिव्ह’ पदावर नियुक्ती झाली. बी.एस्सी.च्या २०२५-२६ शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असतानाच त्यांनी कौशल्य, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर ही संधी मिळवली. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. धनंजय माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. वैभव पतंगे, नॅक समन्वयक डॉ. किरण लोमटे, प्रा. डॉ. संजय बिरादार, प्रा. डॉ. अनिल गाडेकर, प्रा. डॉ. रूपचंद खराडे, प्रा. डॉ. प्रवीण मोरे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
माधवराव पाटील महाविद्यालयात व्याख्यान
मुरूम : विश्वबंधुत्व दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत श्री माधवराव पाटील महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर विशेष व्याख्यान झाले. ‘स्वामी विवेकानंद : व्यक्ती आणि विचार’ या विषयावर मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पटणे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. सहशिक्षक जीवन सूर्यवंशी, प्रा. डॉ. सतीश शेळके व प्रा. डॉ. राम बजगिरे उपस्थित होते. विस्तार सेवा केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी प्रास्ताविक केले. पटणे यांनी विवेकानंदांचे शिकागोतील ऐतिहासिक भाषण, राष्ट्रप्रेम, युवकांतील जिद्द व विश्वबंधुत्वाचा संदेश यावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुजित मटकरी यांनी केले.
कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
भूम : पावसाच्या दीर्घ खंडामुळे धाराशिव जिल्ह्यात खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली असून, कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस पिकांचे नुकसान झाले असून, प्रत्यक्ष शेतशिवारात पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केली. नुकसानभरपाई व दुष्काळी अनुदान, पीक कर्जवसुलीस स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन आणि पीकविम्याची भरपाई मिळण्यासाठी विशेष यंत्रणा राबवावी, असे त्यांनी म्हटले. टंचाईग्रस्त गावांत टँकर, चारा छावण्या व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. रोजगार हमीची कामे सुरू करावीत, वीज बिलात सवलत द्यावी आणि पुढील हंगामासाठी बियाणे-खते उपलब्ध करून द्यावीत. जिल्ह्यासाठी स्वतंत्र विशेष आर्थिक पॅकेजची मागणीही त्यांनी केली.
भूम येथे विश्वबंधुत्व दिन साजरा
भूम : शंकरराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे विश्वबंधुत्व दिन साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व कार्यावर डॉ. नंदू जगदाळे यांनी व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. नितीन पडवळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी केंद्राचे प्रमुख डॉ. गोकुळ सुरवसे उपस्थित होते. दीपप्रज्वलन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. डॉ. जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. लक्ष्मण पवार, डॉ. शिवचरण माळी यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. राजश्री तावरे यांनी केले.
माकणी महाविद्यालयात विश्वबंधुत्व दिन
माकणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व भारत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने विश्वबंधुत्व दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. काकासाहेब सुरवसे होते. प्रमुख पाहुणे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल देशमुख यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे स्वामी विवेकानंदांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाचे महत्त्व स्पष्ट केले. जात, धर्म व देशांच्या सीमा ओलांडून मानवतेचा आदर करणे हाच विश्वबंधुत्वाचा संदेश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. अनिल गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कल्याण कदम यांनी आभार मानले. डॉ. वैभव पतंगे, डॉ. किरण लोमटे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
.....................
IET26A00528
ईट : लांजेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तपासणी अभियान राबविण्यात आले.
लांजेश्वर शाळेत तपासणी अभियान
ईट : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लांजेश्वर येथे गटशिक्षण कार्यालय, भूम यांच्या वतीने शाळा तपासणी अभियान राबविण्यात आले. गटशिक्षणाधिकारी अनिता जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अभियानात केंद्रप्रमुख बी. एफ. म्हेत्रे यांनी शाळेची सविस्तर पाहणी केली. शाळेच्या भौतिक गरजा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची प्रगती, शिक्षकांचे अध्यापन, नवोपक्रम तसेच शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. ‘आपला जीव धाराशिव’ उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामांचीही पाहणी करण्यात आली. केंद्रप्रमुख म्हेत्रे यांनी शिक्षकांशी संवाद साधून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या तपासणी अभियानामुळे शाळेतील शैक्षणिक कार्याला नवी दिशा मिळून गुणवत्तावाढीच्या प्रयत्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सोयाबीनचे नुकसान, शेतकरी संकटात
भूम : पावसाच्या दीर्घ खंडामुळे माणकेश्वर परिसरातील सोयाबीन पीक करपल्याने शेतकऱ्यांवर पीक काढून टाकण्याची वेळ आली आहे. शेतकरी अनुसया विष्णू अंधारे यांनी दहा एकर सोयाबीनसाठी एकरी सुमारे १२ हजार रुपये खर्च केला. एमजीबी बँकेचे एक लाख ७० हजार रुपये कर्ज असून बियाणे, खत व औषधांसाठी सुमारे एक लाख रुपये हातउसने घेतले आहेत. फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेत पाऊस न झाल्याने उत्पादनाची शक्यता मावळली आहे. पीक डोळ्यांसमोर नष्ट करताना मानसिक त्रास होत असल्याचे अंधारे यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई, पीकविमा व विशेष आर्थिक मदत द्यावी. तसेच कर्जवसुलीस स्थगिती देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
माकणीच्या भारत विद्यालयात व्याख्यान
माकणी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भारत विद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. हिप्परगा (रवा, ता. लोहारा) येथील राष्ट्रीय शाळा स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोईटे यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानावर प्रकाश टाकला. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे सदस्य किशोर साठे होते. लेखक व इतिहास संशोधक कमलाकर सावंत, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वामी रामानंद तीर्थ व गोविंदभाई श्रॉफ यांच्या निजामविरोधी लढ्याची माहिती सावंत यांनी दिली. प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. प्राचार्य व्यंकटराव गुंजोटे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रदर्शनात ऋषिकेश माने प्रथम, श्रेया जाधव द्वितीय तर गौरवी साठे तृतीय आली. सूत्रसंचालन दीपक शिंदे यांनी केले. आभार गणेश साठे यांनी मानले.
पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण
माकणी : भारत शिक्षण संस्थेच्या बी.एस.एस. महाविद्यालयात कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथील पाणी व जमीन व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञान व कौशल्यांचा योग्य उपयोग करून बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. धनंजय माने होते. प्रमुख पाहुणे साहित्यिक डॉ. महेश खरात उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पदवीधर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण झाले. डॉ. वैभव पतंगे यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कल्याण कदम यांनी आभार मानले.
शेतातील विद्युत तारा चोरीला
शिराढोण : पावसाने ओढ दिल्याने उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्याची धडपड सुरू असतानाच शिराढोण येथील शेतकरी सचिन डावखरे यांच्या शेतातील सुमारे सहा पोलवरील विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली. रात्री अकरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत होता. त्यानंतर वीज खंडित झाल्यानंतर शेतकरी घरी गेले. सकाळी शेतात गेल्यावर तारा गायब असल्याचे निदर्शनास आले. पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर त्यामुळे नवे संकट निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.