रमाबाई रणवीरांची ‘ती’ धाव
पोचली सरन्यायाधीशांपर्यंत
---
विधी सेवा प्राधिकरणातर्फे सन्मान, मदत
---
बीड, ता. ७ : अंबाजोगाई येथे नुकत्याच झालेल्या ‘अमृत दौड’मध्ये मुलीच्या शिक्षणासाठी हातभार लागावा म्हणून अनवाणी धावलेल्या, तीन हजारांचे पारितोषिक जिंकणाऱ्या रमाबाई रणवीर यांच्या संघर्षाची व जिद्दीची कहाणी भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यापर्यंत पोचली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत या भगिनीला आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सरन्यायाधीस सूर्य कांत यांच्या सूचनेनुसार ‘राष्ट्रीय विधी सेवा’ने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाशी, तर महाराष्ट्र ‘विधी सेवा’ने बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधला. बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वहाब सय्यद यांनी तातडीने रमाबाईंशी संपर्क साधून त्यांना प्राधिकरणाच्या बीड येथील कार्यालयात बोलावून घेतले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली रमाबाई व त्यांच्या दोन्ही मुलींचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना साडी, कपडे आणि शैक्षणिक साहित्य आदी स्वरूपात मदत देण्यात आली. या सन्मानाने रमाबाई भारावून गेल्या.
रमाबाईंची अशी धाव...
--
मूळच्या हिंगोली जिल्ह्यातील ४७ वर्षीय रमाबाई रणवीर अंबाजोगाईत एका अकादमीत स्वयंपाकाचे काम करतात. अंबाजोगाईत भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित ‘अमृत दौड’मध्ये त्या नेहमीच्या पारंपरिक पेहरावात अनवाणी धावल्या होत्या. स्पोर्टस शूज किंवा कसलेही प्रशिक्षण नसताना, हातात स्लीपर धरून साडीचा पदर सांभाळत त्यांनी तीन हजारांचे बक्षीस जिंकले. पतीच्या निधनानंतर दोन मुलींच्या शिक्षणाचा आणि पोलिस दलात भरती होण्याच्या स्वप्नाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी या स्पर्धेत विजय मिळविला.