फोटो- श्री शक्तिपीठ जोगवा ABD26J78331
ओळ ः श्री शक्तिपीठ जोगवा यात्रा संभाजीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर स्वागत करताना भाविक.
------
श्री शक्तिपीठ जोगवा यात्रेचे आगमन
तुळजापूर ते महाराष्ट्रभर गुरुतत्त्व व आदिशक्तीचा जागर
छत्रपती संभाजीनगर, ता. १ ः विश्वशांती, विश्वकल्याण आणि सुसंस्कृत समाजनिर्मितीचा संदेश घेऊन श्रीक्षेत्र तुळजापूर येथून निघालेल्या श्री शक्तिपीठ जोगवा यात्रेचे सोमवारी (ता. ३१) छत्रपती संभाजीनगरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. सोमवारी सायंकाळी ज्योतीनगर येथील श्री ज्योती मंदिर व विठ्ठल मंदिर येथे यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी श्रीज्योती मंदिरात देवीचे रांगोळी, पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भवानी पूजन, परडी पूजन, जोगवा गोंधळ पदे, नामस्मरण आणि गुरुतत्त्व जागरणाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. भाविकांना गहू, तांदूळ, डाळ, खाद्यतेल, तूप अथवा रोख स्वरूपात जोगवा अर्पण केला. आई तुळजाभवानीची मूर्ती, जोगव्याची परडी आणि भगवान श्रीदत्तप्रभूंच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गुरुतत्त्वाची उपासना, आदिशक्तीचा जागर आणि समाजसेवेचा व्यापक संदेश घेऊन निघालेल्या या यात्रेमुळे शहरात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. गुरुतत्त्व प्रदीप परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र तुळजापूर येथे ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या श्रीदत्त दुर्गा महानुष्ठानम् सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी या यात्रेचे आयोजन केले आहे. १४ ऑगस्टला तुळजापूर येथून सुरू झालेली यात्रा ११ सप्टेंबरला पुन्हा तुळजापूर येथे पोचून सांगता होईल.
अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करणार
संकलित जोगव्याचा उपयोग श्रीदत्त दुर्गा महानुष्ठानम्, महायज्ञ, महाप्रसाद, अन्नदान व विविध सेवाकार्यासाठी केला जाणार आहे. महानुष्ठानात १००८ श्री गुरुचरित्र सारामृत पारायणे, श्री गुरुचरित्र कथामृत आणि पंचकुंडात्मक सहस्रचंडी यागासह विविध धार्मिक उपक्रम होणार आहेत. सुमारे २६३३ किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून जाणार आहे. गुरुभक्ती, शक्ती उपासना, पर्यावरण संरक्षण, सामाजिक एकात्मता आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश जनमानसात रुजविणे हा यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे मकरंद महाराज, शंतनू पांडे महाराज यांनी सांगीतले.
----