धाराशिव-तुळजापूर-सोलापूर
रेल्वेमार्गाला २४० कोटींचे बळ
-----
धाराशिव, ता. १७ : सोलापूर- तुळजापूर- धाराशिव या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी सरकारने राज्याच्या हिश्श्याचे आणखी २४० कोटी रुपये वितरीत करण्यास गुरुवारी (ता. १७) मंजुरी दिल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
८४.२८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा सुधारित खर्च ३ हजार २९५ कोटी ७४ लाख रुपये आहे. त्यात राज्याचा ५० टक्के हिस्सा म्हणजे १ हजार ६४७ कोटी ८७ लाख रुपये आहे. यापूर्वी ३४० कोटी रुपये वितरीत झाले असून, आता मिळालेल्या २४० कोटींमुळे कामांना वेग येईल, अशी माहिती पाटील यांनी दिली. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले. रेल्वेमार्गामुळे धार्मिक पर्यटनासह उद्योग, शेतमाल वाहतूक आणि रोजगाराला हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-----
प्रकल्पाचे प्रमुख टप्पे
१. धाराशिव ते तुळजापूर (३०.७० किमी) : सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून जून २०२७ पर्यंत हा टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यात तुळजापूर, वडगाव आणि सांजा ही नवी स्थानके उभारली जात आहेत.
२. सोलापूर ते तुळजापूर (५३.५८ किमी) : सुमारे १ हजार कोटी रुपयांच्या या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यात १ किमीपेक्षा लांब २ बोगदे तसेच खेड, मर्डी, तामलवाडी, माळुंब्रा आणि रायखेल ही ५ नवीन स्थानके उभारली जातील. हा टप्पा डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.