Chhatrapati Sambhajinagar : गुगल सोल्युशन चॅलेंज कंपनीने घोषणा केलेल्या जागतिक स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकावला आहे. विद्यार्थ्यांनी ‘स्पूनशेअर ॲप’ची निर्मिती करीत जागतिक स्तरावर टॉप तीनमध्ये येण्याचा मान पटकावला.
‘झिरो हंगर’ अर्थात ‘शून्य भूक’ हा विषय घेऊन या विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याबद्दल गुगल कंपनीकडून प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. बक्षीस वितरण बंगळूर येथे विविध आंततरराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सतीश चव्हाण यांनी सोमवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत दिली.
सानिका चव्हाण, कृष्णा औटे, मोहम्मद रेहान व शुभम पिटेकर अशी या चार विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांना प्रत्येकी तीन हजार डॉलर (१० लाख रुपये) इतके बक्षीस जाहीर झाले आहे. चव्हाण यांनी सांगितले, की संयुक्त राष्ट्रांच्या देशांनी एकत्र येत शाश्वत विकासासाठी १७ प्रकारची ध्येये निर्धारित केली आहेत.
यामध्ये गरिबी संपविणे, समृद्धी करणे; तसेच ‘झिरो हंगर’ या उद्दिष्टाचाही समावेश आहे. ही १७ प्रकारची ध्येये गुगल तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करावयाची होती. हाच धागा पकडत कंपनीने गुगल सोल्युशन चॅलेंज या स्पर्धेची घोषणा केली होती. स्पर्धेमध्ये देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘स्पूनशेअर’ नावाच्या ॲपला सर्वांनीच पसंती दिली. पत्रकार परिषदेला डॉ. सुभाष लहाने, प्रा. किरण आवरगावर यांची उपस्थिती होती.
देवगिरीच्या या विद्यार्थ्यांच्या चमूचा प्रवासही रोमांचक आहे. कठीण पातळीतून यांनी टॉप थ्रीमध्ये स्थान मिळविले. ५ एप्रिल २०२४ मध्ये टॉप १०० मध्ये नंतर २८ मे २०२४ रोजी टॉप १० मध्ये व शेवटी २७ जून २०२४ मध्ये टॉप ३ मध्ये स्थान मिळाले. गुगल कंपनीने आयोजित केलेल्या गुगल आयओ या कार्यक्रमात बंगळूर येथे १७ जुलै २०२४ रोजी विद्यार्थ्यांना ॲपचे सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले आहे.
अनेक एनजीओ मदतीच्या नावाखाली आमच्याकडे ॲप्रोच होतात, परंतु ज्या संस्था अन्नदानाचे महत्कार्य करतात, अशा संस्थांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करूनच आम्ही त्यांचा समावेश करून घेतो.
या ॲपमुळे ज्या व्यक्तीला अन्नदानाची इच्छा आहे, ती व्यक्ती ॲपच्या माध्यमातून संपर्क करू शकतो; तसेच ज्यांना अन्नाची गरज आहे, त्यांनाही या ॲपद्वारे मागणी नोंदविता येते. विशेष म्हणजे, यामध्ये संपर्क करू न शकणाऱ्या भिकारी, गरीब लोकांना अन्नदान करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना जोडण्यात आले आहे.
शहरातील एमजीएम आणि ग्लोबल संस्था या ॲपसोबत जोडल्या असून, हजारो किलो अन्न आतापर्यंत गरजूपर्यंत पोचल्याचे सानिका चव्हाण या विद्यार्थिनीने सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, शिल्लक राहिलेल्या व खाण्यायोग्य नसलेल्या अन्नाचा खत म्हणून वापर करण्यासाठी हे विद्यार्थी खत कंपन्यांपर्यंतही पोचलेले आहेत. एनजीओसोबतच खत कंपन्या, शेतकऱ्यांचाही डाटा या ॲपमध्ये फीड करून ठेवण्यात आला आहे. सध्या हे ॲप दीड हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी डाउनलोड केले असून, यामध्ये पाच देशांचाही समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.