Chhatrapati Sambhajinagar : ‘त्यांच्या’ संघर्षाला `शहेनशहा`ची शाबासकी; ‘स्वच्छतारत्न’ बचत गटाला दिली १० स्वच्छता यंत्रे

नाले सफाईचे मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरताना त्यांचा जीव कासावीस व्हायचा. पण, मनात जिद्द होती आणि या जिद्दीला शासनाच्या योजनेची साथ मिळाली.
स्वच्छतारत्न
स्वच्छतारत्नSakal

छत्रपती संभाजीनगर : नाले सफाईचे मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरताना त्यांचा जीव कासावीस व्हायचा. पण, मनात जिद्द होती आणि या जिद्दीला शासनाच्या योजनेची साथ मिळाली. त्यातून स्वच्छतारत्न बचत गटाची स्थापना करत स्वतःचे वाहन खरेदी करून त्यांनी व्यवसायाला गती दिली.

त्यांच्या संघर्षाची ही बाब महानायक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी दखल घेत बचत गटाच्या सदस्यांना शाबासकी देत तब्बल १० लाखांची यंत्रसामग्री भेट म्हणून दिली. शहरातील छोटा मुरलीधरनगर परिसरातील सफाई कामगार मिळेल ते साफसफाईचे काम करून संसाराचा गाडा चालवत होते.

२०१५ मध्ये महापालिकेने यातील दहा जणांना एकत्र आणले व ‘दीनदयाळ अंत्योदय योजने’च्या ‘राष्ट्रीय योजना नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत त्यांचा ‘स्वच्छतारत्न बचत गट’ स्थापन केला. सुनील सिरसवाल बचतगटाचे अध्यक्ष बनले तर सचिव म्हणून गुलाबसिंग तुसामड यांनी जबाबदारी घेतली.

बचत गटाची बांधणी झाल्यानंतर २०२१ मध्ये चिकलठाणा येथील सेन्ट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बचत गटाचे संयुक्त खाते उघडून १० हजार रुपयांचे खेळते भांडवल देण्यात आले. सोबतच बँकेने ‘स्वच्छतारत्न बचत गटा’ला १० लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले.

त्यातून बचत गटाने सफाई कामासाठी लागणारे वाहन व यंत्रसामग्री विकत घेतली. या कामगारांचे घर नालेसफाईच्या कामावरच चालायचे. कधी कुठे गटार तुंबले, कुणाची तक्रार आली तरच सफाईचे काम मिळायचे आणि त्यावर मिळणाऱ्या मजुरीवरच कुटुंबाची कशीबशी गुजराण व्हायची.

मात्र, वाहन आणि यंत्रसामग्री खरेदी केल्यानंतर त्यांचे काम सोपे आणि सुलभ झाले. त्यांचा कामाचा उत्साह वाढला आणि वेळही वाचू लागला. त्यानंतर बचत गटाने महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या मदतीने शहरातील ४० ते ५० सोसायट्यांशी समन्वय साधून तेथील साफसफाईची काम मिळवले. पूर्वी दिवसाला

कसेबसे शंभर रुपये मिळणाऱ्या हातांना, आता त्यांना चांगले पैसे मिळायला लागले. यामुळे घाणीच्या कामाला प्रतिष्ठा मिळाली. विशेष म्हणजे आपल्या उन्नतीसोबतच त्यांनी बँकेच्या कर्जाचीही न चुकता परतफेड केली.

या सफाई मजुराच्या संघर्षाची बाब ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी तातडीने सिरसवाल आणि तुसामड यांना मुंबईत बोलावून घेऊन शाबासकी दिली. सोबतच बचतगटासाठी १० स्वच्छता यंत्रे भेट दिली.

समाजात मिळाली प्रतिष्ठा

बचत गटाचे अध्यक्ष सिरसवाल यांनी सांगितले, ‘‘पूर्वी घाणीतले काम करणारे म्हणून आमच्याकडे तुच्छतेने पाहिले जायचे. पण, आम्ही प्रशिक्षण घेऊन यंत्रांच्या मदतीने काम सुरू केल्यानंतर समाजात प्रतिष्ठा मिळाली. महापालिकेतील राष्ट्रीय उपजीविका अभियानाचे काम पाहणारे सुरेंद्र पाटील, भरत मोरे, शारदा खरात यांच्यासह बांधकाम व्यावसायिक तथा क्रेडाईचे माजी अध्यक्ष नितीन बगडिया यांनी वारंवार प्रोत्साहन दिले.’’

पाच तास मारल्या गप्पा

अमिताभ बच्चन यांनी बचत गटातील चार सदस्यांना आपल्या बंगल्यावर बोलावून घेऊन शाबासकी दिली. त्यांनी आमच्या सोबत नाश्‍ता केला. पाच तास मार्गदर्शन केले. कोणतेही काम छोटे-मोठे नसते, असा सल्ला बच्चन यांनी दिल्याचे सिरसवाल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com