८ ते १० हजार शिक्षकांची पदे कमी होण्याची भीती

८ ते १० हजार शिक्षकांची पदे कमी होण्याची भीती
Published on
संचमान्यतेच्या अटींविरुद्ध उद्या शिक्षकांचा पुण्यात मोर्चा -- छत्रपती संभाजीनगर, ता. २ : कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेसाठी लागू केलेल्या जाचक अटींमुळे हजारो शिक्षकांची पदे कमी होण्याची शक्यता आहे. याच्या निषेधार्थ कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघातर्फे शुक्रवारी (ता. चार) पुण्यात शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटनेने केले. याबाबत विवेकानंद महाविद्यालयात जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेची बैठक झाली. कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यता प्रचलित पद्धतीने करावी आणि शिक्षकांची पदे कमी करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संचमान्यतेच्या नियमांविरोधात महासंघाने यापूर्वी विविध टप्प्यांवर आंदोलने केली. मात्र, त्यानंतरही नियमांमध्ये बदल झालेला नसल्याचा आरोप संघटनेने केला. राज्यभरात सुमारे ८ ते १० हजार शिक्षकांची पदे कमी होण्याची शक्यता असल्याचा दावा महासंघाने केला. विभागातील पाचही जिल्ह्यांतही अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याचीही परिस्थिती निर्माण झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. शुक्रवारी दुपारी एकला पुण्यातील शनिवारवाड्यापासून या मोर्चाला सुरवात होईल, असे उपाध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील, सचिव प्रा. गोविंद शिंदे, प्रा. चंपालाल कहाटे, प्रा. डी. एल. हिवरे, प्रा. अरूण काटे यांनी सांगितले. ---- विद्यार्थीसंख्येनुसार विषयांचा कार्यभार द्या तासिका पूर्वीप्रमाणे ४५ मिनिटांची करावी, प्रात्यक्षिक बॅचमधील विद्यार्थ्यांची संख्या ३० ऐवजी २० करावी आणि तुकडीतील विद्यार्थीसंख्या विचारात घेऊन विषयांचा कार्यभार निश्चित करावा, या मागण्याही महासंघाने केल्या आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com