औरंगाबादच्या वडखा व नाथनगरमध्ये भुरट्या चोरांचा धुमाकूळ

शेतकरी हवालदिल; अनेक विद्युत पंप व खत बॅगा चोरीला
Theft of electric pumps fertilizer bags in Wadkha Nathnagar of Aurangabad
Theft of electric pumps fertilizer bags in Wadkha Nathnagar of Aurangabad

करमाड (जि. औरंगाबाद) - मागील काही महिन्यांपासुन शेंद्रा औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या नाथनगर व वडखा येथील शेतकर्‍यांच्या शेतातुन विद्युत पंप, जनावरे व शेतवस्तीवर ठेवलेल्या रासायनिक खतांच्या गोण्या चोरीस जाण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन या भुरट्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांच्यावतीने करण्यात येत आहे.

मागील वर्षी पडलेल्या जोरदार पावसामुळे येथील विहीरींना भर उन्हाळ्यात चांगले पाणी होते. त्यामुळे परिसरात बागायती शेती करून शेतकरी फळबागाशिवाय भाजीपाला घेत. दरम्यान, मागील दोन महिन्यांपासुन भुरट्या चोरट्यांनी या भागाला लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणात विद्युत पंपांची चोरी वाढली. त्यामुळे पाणी असुनही पंप चोरीला गेल्याने पिकांना पाणी देता येत नव्हते.

सद्यस्थितीत या भागात पावसानेे दडी मारल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. यातच विहीरींना पाणी असुनही अनेक शेतकर्‍यांचे विद्युत पंप चोरीला जात असल्याने पिके विहीरीत पाणी असुनही सुकुन वाळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे दुहेरी आर्थिक नुकसान होत असल्याने तो मेटाकुटीला आल्याचे या भागातील चित्र आहे. काही दिवसापुर्वी पंडीत काकडे यांचा विद्युत पंप, राधाकिसन काकडे यांचा पंप चोरीस गेला.

शनिवारी रात्री वडख्याचे उपसरपंच बबनराव काकडे यांच्या राहत्या वस्तीजवळील विहीरीतील चालु पाच एच पी क्षमतेचा विद्युत पंप व 3 एच पी क्षमतेचे कटर मशीनवर या चोरट्यांनी डल्ला मारला. यापुर्वी भगवान काकडे यांचे गोठ्यातुन चार शेळ्या, उल्हास काकडे यांची गाय व वस्तीवरील खोलीतुन 25 डीएपी खतांच्या गोण्या व शिवाजी काकडे यांचे फवारणी यंत्र चोरीस गेले. याशिवाय मागील दोन महिन्यांत आकाश साबळे, ज्ञानदेव काकडे, आप्पा काकडे व इतर अनेक शेतकर्‍यांचे विद्युत पंप चोरीस गेल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, पोलीस विभागात अशा चोरींचा तपास केला जातो की, पोलीस आपल्यालाच अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडतील अथवा अनेकाकडे विद्युत कनेक्शन नसते व पंप तर चालतात मग चोरीची तक्रार द्यायला गेलो तर विद्युत बिल अथवा इतर माहिती मागितली तर काय होईल या व इतर अनेक गोष्टींमुळे शेतकरी या चोरीच्या घटनेची ठाण्यात तक्रार द्यायला धजावत नसल्याने हजारो पंप चोरीला जाऊनही बोटावर मोजण्याइतपतच चोरीची नोंद पोलीस दप्तरी असल्याचे दिसुन येते.

तथापि, करमाड पोलीस ठाण्यात दाखल चोरीपैकी एकाही चोरीचा तपास लागलेला नसल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. कदाचित हे ही एक कारण असु शकते की यामुळेही अशा विद्युत पंप चोरीच्या तक्रारी ठाण्यात येत नसाव्यात. इकडे दिवसेंदिवस या चोरीच्या घटनेत वाढ होत चालल्याने शेतकर्‍यांनी आता सामुहिकरित्या एकत्रित येऊन जागता पहारा देण्याची गरज निर्माण झाली आहे. सोबतच संबंधितांनीही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता या चोरांना अटकाव घालावा अशी मागणी करण्यात येत आहे.

याबाबत बबनराव काकडे यांनी रविवारी (ता.तीन) करमाड पोलीस ठाण्यात त्यांच्याकडे झालेल्या चोरीची तक्रार दिली. याशिवाय लाडसावंगी रस्त्यावरील भांबर्डा व दुधड भागातुनही अनेक विद्युत पंप चोरीस गेले आहेत. पंपाशिवाय या भागातुन अनेक औषध फवारणीचे एसटीपी यंत्रे सुध्दा चोरीस गेली आहेत. यात रस्त्यालगतच्या शेतातुन चोरी होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com