पथदिव्यांअभावी राजमाता जिजाऊ
चौक ते भोगावती पुलापर्यंत अंधार
-----
धाराशिव, ता. ३१ (बातमीदार) : शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोरील चौकादरम्यानच्या वर्दळीच्या डीआयसी रस्त्यावर अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यालगत झालेली अतिक्रमणे आणि अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने पादचारी तसेच वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या मार्गावर दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यातील अनेक अतिक्रमणे रस्त्यालगतच्या साइडपट्ट्यांवर आहेत. काहींनी व्यवसायासाठी जागा भाड्याने दिल्या आहेत. बहुतांश दुकानांसमोर ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा नसल्याने दुकानात येणारे नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहने थेट मुख्य रस्त्यावर उभी करतात. परिणामी, मुळात रुंद असलेला रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.
-----
गर्दीच्या वेळेत कोंडी
सकाळी आणि सायंकाळी वाहनांची संख्या वाढताच या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत विविध कामांसाठी येणारे नागरिक, शासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी या कोंडीत अडकून पडतात. वाहनांची संख्या वाढत असताना पार्किंगचे नियोजन नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
-----
अतिक्रमणे हटविण्याची गरज
डीआयसी रस्त्याच्या दुतर्फा झालेली अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे. दुकानांसमोर पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी सम-विषम पार्किंगची व्यवस्था केल्यास वाहतुकीला शिस्त लावण्यास मदत होऊ शकते. तसेच मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर नियमित कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
-----
पथदिव्यांचाही अभाव
राजमाता जिजाऊ चौक ते भोगावती नदीच्या पुलापर्यंतच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नाही. रस्त्यालगत असलेल्या पथदिव्यांमध्ये मोठे अंतर असल्याने अनेक ठिकाणी अंधार असतो. समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे चालकांना काही वेळा समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.