उदगीर तालुका दुष्काळग्रस्त
जाहीर करा : बसवराज रोडगे
उदगीर, ता. १६ (बातमीदार) : तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे उदगीर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बसवराज रोडगे यांनी केली.
पिकांची स्थिती पाहता महसूल प्रशासनाने केवळ कार्यालयीन नोंदींवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करावी. पीक कापणी प्रयोगाच्या कालावधीपर्यंत बहुतांश पिके कोलमडून गेल्यास पारंपरिक पद्धतीने अंतिम आणेवारी काढताना शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नजरी आणेवारी अंतिम मानून त्याला पर्जन्यमानातील तुटीची जोड द्यावी.
शेतकऱ्यांना १०० टक्के पीकविमा तसेच एनडीआरएफच्या निकषांनुसार शासकीय मदत व सवलती द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळाचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होत असल्याने विद्यार्थ्यांची फी माफ, पीक कर्जावरील व्याजमाफी द्यावी आणि पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असेही रोडगे यांनी सांगितले. शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे मंजूर करून सुरू करावीत. पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच गरज भासल्यास चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणीही रोडगे यांनी केली.