भाजीपाल्याच्या भावात चढ-उतार
---
कांदा, लिंबू, अद्रक, लसणाची आवक कमी; टोमॅटो, भेंडी, वांगी मुबलक
---
सकाळ वृत्तसेवा
जाधववाडी, ता. २० : भाजीपाला बाजारात सध्या आवक मुबलक आहे. मात्र, सणासुदीचे दिवस असल्याने विक्री काहीशी घटल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदवले आहे. बाजारपेठेत मंदीचे वातावरण असल्याने भाजीपाला विक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, काही भाज्यांच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
टोमॅटोचा भाव प्रतिकिलो ३० रुपयांवरून ४० रुपये झाला आहे, तर वांग्याचा भाव ५० रुपयांवरून ४० रुपयांपर्यंत खाली आला. भेंडीचे भाव ६० रुपयांवरून ४० रुपयांवर, तर काकडीचे भाव ५० रुपयांवरून ४० रुपयांवर आले आहेत. दुसरीकडे, अद्रकाचा भाव २०० रुपयांवरून २४० रुपये, तर कंटुल्याचा भाव २०० रुपयांवरून २४० रुपये प्रतिकिलोवर पोचला आहे. लिंबाचे भाव सर्वाधिक २४० रुपये प्रतिकिलो असून, लसूण दर्जानुसार २५० ते ४०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. शेवग्याचा भाव १०० रुपये प्रतिकिलो आहे. बटाटे २५ ते ३० रुपये, कांदा ७० रुपये, भोपळा ४० रुपये, गाजर ६० रुपये, कारले ६० रुपये आणि कोबी ६० रुपये किलो आहे. याशिवाय वाल व गिलके ८० रुपये, हिरवी मिरची व सिमला मिरची ६० रुपये, दिलपसंद ८० रुपये, दोडके ६० रुपये, तर श्रावण घेवडा ६० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे.
---
दुष्काळाचा बाजारावर परिणाम
दुष्काळामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांच्या खर्चावर मर्यादा आल्या असून, बाजारातील एकूण उलाढालीवरही त्याचा परिणाम होत आहे. भाजीपाल्याची आवक पुरेशी असली तरी ग्राहकांकडून खरेदीचे प्रमाण कमी असल्याने व्यापाऱ्यांमध्ये मंदीचे वातावरण आहे. काही भाज्यांचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी कांदा, लिंबू, लसूण व अद्रकाची आवक घटल्याने त्यांचे भाव चढेच आहेत.
----
भाजीपाल्याचे आजचे भाव (प्रतिकिलो)
बटाटे ः २५ ते ३० रुपये
कांदा ः ७० रुपये
भोपळा ः ४० रुपये
काकडी ः ४० रुपये
टोमॅटो ः ३० ते ४० रुपये
वांगे ः ४० रुपये
भेंडी ः ४० रुपये
गाजर ः ६० रुपये
कारले ः ६० रुपये
कोबी ः ६० रुपये
वाल - ः ८० रुपये
गिलके ः ८० रुपये
हिरवी मिरची ः ६० रुपये
सिमला मिरची ः ६० रुपये
दिलपसंद ः ८० रुपये
लिंबू ः२४० रुपये
दोडके ः ६० रुपये
शेवगा ः १०० रुपये
अद्रक ः २४० रुपये
लसूण ः २५० ते ४०० रुपये
श्रावण घेवडा (बिन्स) ः ६० रुपये
कंटुले ः २४० रुपये