((एक मेन)) फोटो आहे...........
.................
धरणीमायचे पोट कोरडे
पाच वर्षांच्या तुलनेत विहिरींची पातळी ७ मीटरने खालावली
अविनाश पोफळे ः सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १५ ः जिल्ह्यात यंदा पावसाने दिलेली प्रचंड ओढ आणि सलगच्या पर्जन्यखंडामुळे केवळ जमिनीवरचे पीकच सुकले नाही, तर धरणीमातेच्या पोटातील पाणीसाठाही कमालीचा तळाला गेला आहे. भूजल विकास आणि यंत्रणेने घेतलेल्या शोधनिबंध व नोंदीनुसार जिल्ह्यात भूगर्भातील आणि विहिरींमधील पाणीपातळीत प्रचंड घसरण झाली असून, आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
......
पाच वर्षांच्या तुलनेत
तब्बल ७.०२ मीटरने घट
भूजल विकास आणि यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील ११४ निरीक्षण विहिरींच्या पाणी पातळीची तपासणी करण्यात आली. सप्टेंबर २०२६ च्या नोंदीनुसार, जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींची सरासरी पाणी पातळी ९.५३ मीटर नोंदवली गेली आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरी पाणी पातळीशी तुलना केल्यास यंदा विहिरींच्या पाणीपातळीत तब्बल ७.०२ मीटरने (सुमारे २३ फूट) मोठी घट झाली आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाच भूजलाची ही बिकट अवस्था असल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.
धाराशिव जिल्ह्यावर केवळ गायब झालेल्या पावसाचेच संकट नाही, तर जमिनीखालील ‘पाणी बँक’ही रिकामी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला तातडीने पाणी आरक्षण, टंचाई निवारण आणि टँकर नियोजनाची युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी लागणार आहे.
.........
((पाँईटर))
होणारे संभाव्य गंभीर परिणाम
- सप्टेंबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठल्यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच विहिरी आणि कूपनलिका (बोअरवेल) आटू लागल्या आहेत. अनेक गावांमध्ये पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.
- विहिरी आणि भूगर्भातील पाणी आटल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करणे किंवा ऊस, फळबागा जगवणे अशक्य झाले आहे.
- पाणी पातळी खाली गेल्याने शेतकरी आणि नागरिक अधिक खोल बोअरवेल घेण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे भूजलाचे उर्वरित साठेही धोक्यात येत आहेत.
.......
दूरगामी व भीषण परिणाम
- ऑक्टोबर ते मे दरम्यानचा काळ अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांना व वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची चिन्हे आहेत.
- पाणीअभावी डाळिंब, लिंबू व इतर फळबागा जळून जाण्याचा धोका आहे. तसेच पशुधनासाठी पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करणे हे मोठे आव्हान ठरेल.
- शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यामुळे ग्रामीण भागातून शहरांकडे किंवा इतर जिल्ह्यांत रोजगारासाठी होणारे स्थलांतर वाढू शकते.
- भूगर्भातील पाणीपातळी ऐतिहासिक तळाला गेल्यामुळे आगामी काळात केवळ मोठा पाऊस होऊन भागणार नाही, तर मोठ्या प्रमाणात कृत्रिम भूजल पुनर्भरण करणे अनिवार्य ठरणार आहे.
..........
((कोट))
यंदा पावसाची तूट मोठी आहे. मागील वर्षी १०६ टक्के, तर यंदा आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढलेला नाही. टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. पाण्याचे स्रोत कोरडे पडत आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरेजेचे आहे. सार्वजनिक तसेच खासगी कूपनलिका, विहिरींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक होणार आहे.
- रवींद्र मांजरपकर, वरीष्ठ भू-वैज्ञानिक, धाराशिव
........................