((एक मेन))
..........
सप्टेंबरमध्येच नागरिकांवर
पाणी...पाणी करण्याची वेळ
सात गावांना ९ टँकरद्वारे पाणीपुरवठा, १८० विहिरी अधिग्रहित
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ८ : पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे पिके करपून गेली असतानाच आता जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईने डोके वर काढले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीलाच ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले असून, जिल्ह्यातील ७ गावांना ९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ऐन पावसाळ्यातच ही परिस्थिती ओढवल्याने आगामी काळात जिल्ह्यासाठी पाणीटंचाईची भीषणता अधिक वाढण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
......
टंचाईची सद्यःस्थिती आणि प्रशासकीय उपाययोजना
टंचाईचा घटक...सद्यःस्थिती...उपाययोजना
टँकरग्रस्त गावे...७ गावे (धाराशिव, लोहारा तालुका)...धाराशिव तालुक्यात सर्वाधिक झळ
कार्यरत टँकर...९ टँकर सुरू...नळाद्वारे पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा ७ ते ८ दिवसांवर
अधिग्रहित विहिरी/बोअरवेल...१८० स्रोतांचे अधिग्रहण...महिनाभरात अधिग्रहित विहिरींची संख्या १२८ वरून १८० वर
जलप्रकल्प स्थिती...पाणीसाठा तळाला...लघु व मध्यम प्रकल्पांत अपुरा पाणीसाठा; शेततळी कोरडी
......
धाराशिव तालुक्याला
सर्वाधिक टंचाईची झळ
जिल्ह्यात पाणीटंचाईची सर्वाधिक तीव्रता धाराशिव तालुक्यात पाहायला मिळत आहे. धाराशिव तालुक्यातील कौडगाव बावी, करजखेडा, बोरखेडा, पळसप, नांदुर्गा या गावांत टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. लोहारा तालुक्यातील सास्तूर आणि सालेगाव येथेही प्रत्येकी एक टँकर सुरू करण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये आधी ४ ते ५ दिवसांआड पाणी येत होते, तिथे आता नागरिकांना ७ ते ८ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. महिनाभरापूर्वी जिल्ह्यात ६ गावांत ८ टँकर सुरू होते, आता त्यात वाढ होऊन १८० विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
........
राखीव पाणीसाठा वाचविण्यासाठी
गस्ती पथके तैनात करण्याची गरज
पावसाची ओढ अशीच कायम राहिल्यास टंचाईचे संकट अधिक तीव्र आणि भीषण होणार आहे. जून व जुलै महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने लघु व मध्यम प्रकल्पांत पाण्याची आवकच झाली नाही. ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरचा पहिला आठवडाही कोरडा गेल्यामुळे विहिरी आटल्या असून बोअरवेलनेही तळ गाठला आहे. आगामी काळात पावसाने अशीच दांडी मारल्यास पुढील नऊ महिने जिल्ह्यासाठी अत्यंत कठीण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवून चालणार नाही, तर गस्ती पथके तैनात करून डोळ्यात तेल घालून पाण्याचा होणारा अवैध उपसा रोखणे अत्यंत तातडीचे बनले आहे.