तलाव, बंधारे पाहणीसाठी भरारी पथके
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १ ः संभाव्य ‘एल निनो’च्या प्रभावामुळे घटलेले पर्जन्यमान आणि आगामी काळातील पावसाची अनिश्चितता पाहता पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन व नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पाझर तलाव आणि बंधाऱ्याची नियमित पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिले आहेत. यासाठी तहसील स्तरावर प्रकल्पनिहाय विशेष पथके तैनात केली जाणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या पथकात तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, पाणीपुरवठा व पाटबंधारे विभागाचे अभियंता, महसूल अधिकारी, पोलिस बीट अंमलदार, ग्रामसेवक, कृषी सहायक आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.
अनधिकृत पाणी उपशावर कारवाई
पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या प्रकल्पांमधून अनधिकृतपणे पंप, मोटारी किंवा पाइपलाइनद्वारे पाणी उपसल्याचे आढळल्यास महावितरणच्या मदतीने तातडीने विद्युत पुरवठा खंडित करून कायदेशीर कारवाई केली जाईल. जलसाठ्याचे संवर्धन आणि टंचाईवर प्रभावी नियंत्रण राखण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. या कार्यात कोणतीही दिरंगाई अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी पुजार यांनी दिला आहे.
.........
((चौकट))
अहवाल रोज सादर करणार
विशेष भरारी पथके तलावांना दररोज भेटी देऊन प्रकल्पाचे नाव, एकूण क्षमता, उपलब्ध साठा आणि आढळलेल्या अनियमितता यांची स्वतंत्र नोंदवहीत नोंद ठेवतील. गंभीर बाबी तातडीने तहसीलदारांना कळवून, तहसीलदारांमार्फत दररोज ‘गुगल शीट्स’द्वारे हा अहवाल थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला जाणार आहे.