पान १ उभे तीन कॉलम
---
LTR17HTP03.jpg लातूर ः पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आदी.
---
पाणी चोरणाऱ्यावर गुन्हे दाखल होणार
--
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शेतकऱ्यांना दिला इशारा
----
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १७ ः लातूरकर यंदा दुष्काळाचा सामना करीत आहे. प्रकल्पातील पाणीसाठे पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश आहेत, असे असताना देखील मांजरा धरण असेल किंवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरून पाण्याची चोरी होत आहे. याची दखल आता पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली आहे. अशी पाण्याची चोरी होत असेल तर संबंधीतावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. सोयाबीन तसेच इतर पिकाचे देखील नुकसान होत आहे. लातूरसह मराठवाडा व विदर्भातील दुष्काळासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली आहे. पंचनामे लवकरच सुरु केले जातील. केंद्र व राज्याची मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले. पीकविमा कंपन्यांवर आमचे लक्ष आहे. पंचनाम्याच्या वेळी चांगले प्लॉट दाखवून नुकसान कमी दाखवण्याचे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. दुष्काळाची परिस्थिती असली तर परतीचा मान्सून संपलेला नाही. त्यामुळे नियमानुसार दुष्काळ जाहिर करण्यात अडचणी आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, महापौर जयश्री सोनकांबळे, आयुक्त राहुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपस्थित होते.
----
टंचाईचा घेतला आढावा
पाणीसाठे आरक्षित करण्यात आले आहेत. प्रकल्पांतील पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी पथके गठीत करावीत. महानगरपालिका, महावितरण, पोलिस आणि महसूलसह सर्व संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन मांजरा धरणातून होणारा अवैध पाणी उपसा आणि लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधून होणारी पाणी चोरी रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी. पीक कापणी प्रयोगात नुकसानाची काळजीपूर्वक नोंद करावी आणि नुकसानाची वस्तुस्थिती अचूक अहवालातून मांडली जाईल याची पूर्ण काळजी घ्यावी, असे पालकमंत्री म्हणाले.
---
चौकट
सातारा, कोल्हापूर गॅझेटची
कायदेशीर बाजू तपासणी सुरू
आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेट लागू केले आहे. बारकाईने अभ्यास करून ते लागू केल्याने न्यायालयाने त्याला स्थगिती दिली नाही. सातार व कोल्हापूर गॅझेटची कायदेशीर बाजू तपासणे सुरू आहे. हैदराबाद गॅझेटचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना या दोन गॅझेटच्या संदर्भात निर्णय घेतला गेला तर अडचणी ठरू नये याकरिता शासन काळजी घेत आहे, असे पालकमंत्री भोसले म्हणाले.