World Soil Day : जमिनीचे आरोग्य बिघडले; अन् उत्पन्न घटले

सेंद्रिय खताची गरज : पिकांच्या उत्पादकतेवर थेट परिणाम
World Soil Day 2022
World Soil Day 2022

औरंगाबाद : रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अनिर्बंध वापर, पीक पद्धती, सेंद्रिय खतांचा अभाव यासह विविध कारणांनी जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. यामुळे जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी, सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षण करून त्यानुसार सेंद्रिय खताची गरज आहे.

जमिनीच्या आरोग्याचा विचार करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य पत्रिका ही महत्वकांक्षी योजना राज्यात २०१५-१६ पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मातीचे नमुने तपासले जातात. कृषी सहसंचालक कार्यालयातील श्री.भोगे म्हणाले, या माती परीक्षणात मुख्यत्वे मृदा नमुन्यात नत्राचे प्रमाण कमी, स्फूरदचे मध्यम तर पालाशचे भरपूर असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर सेंद्रिय कर्बाचेही प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येत आहे. जमिनीत सेंद्रिय कर्ब अतिशय महत्त्वाचा घटक आहे.

त्याच्या कमतरतेमुळे चोपन जमिनीचा घट्टपणा वाढतो. त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. मातीची धूप होते, पिकाला रासायनिक अन्नद्रव्य कमी प्रमाणात उपलब्ध होते. स्फुरद कमी मिळते. चुनखडीच्या जमिनीत अन्नद्रव्याची स्थिरता वाढते. जैविक संख्येत घट होते. कृषीतज्ज्ञ उदय देवळाणकर म्हणाले, जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पूर्वी जमिनीच्या ऊर्जेचे चक्रीकरण करण्याच्यादृष्टीने शेती केली जायची. पूर्वी मिश्र पीकपद्धती होती. पिकांची फेरपालट केली जायची.

नवीन काळात इंग्रज आल्यानंतर पीक पद्धतीच बदलून गेली. रसायनांचा वापर वाढला पण शेतकऱ्यांना तेवढे उत्पन्नही होत नाही. त्याचा परिणाम आजपर्यंत आपण पाहतोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसत आहेत. जिथे बागायती जमीन तिथे खारपट जमीनी वाढल्या, जमीनी खराब झाल्या, जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाले आणि जमिनीची उत्पादकताही कमी झाली आहे. याला केवळ शेतकऱ्यांनाच जबाबदार धरता येणार नाही. मातीच्या आरोग्यावर पूर्ण समाजाचे भवितव्य अवलंबून आहे.

पूर्वी रासायनिक खतांऐवजी हिरवळीच्या खतांची लागवड करून ती जमिनीत दाबली जायची आणि कडधान्यांची लागवड केली जायची. यामुळे जमिनीचे आरोग्य टिकून होते असे श्री. देवळाणकर यांनी सांगितले.

यामुळे कमी होते सुपीकता

  • रासायनिक खतांचा अमर्याद वापर

  • जास्त उत्पादनासाठी संकरित वाणांची लागवड.

  • मुख्य, दुय्यम व सुक्ष्म खतांचा अयोग्य वापर

  • पाण्यामुळे जमिनीची होणारी धूप

  • क्षारपट पाण्याचा अमर्याद वापर

  • पिकांची फेरपालट न करणे

  • जास्त पाणी पिणाऱ्या पिकांची लागवड

सुपीकता वाढविण्यासाठी हे गरजेचे

  • फेरपालट करताना कडधान्य पिकाची लागवड

  • शिफारशीनुसार सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा

  • धेंचा व ताग या हिरवळीच्या खत पिकांची लागवड

  • पीक आच्छादनाचा वापर करावा

  • पशुधन वाढवून शेणखताचा वापर वाढवावा लागेल.

पशुधन कमी झाले आणि शेणखताचा वापरही कमी झाला. पुन्हा जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा लागेल. मातीचे संरक्षण करण्याच्या पारंपरिक ज्ञानाचे पुनरुज्जीवन करावे लागेल.

- उदय देवळाणकर, कृषीतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com