युवकांच्या सहभागातून विकसित
भारत साकारेल ः उज्जैनकर
---
बीड, ता. १३ : युवकांच्या सक्रिय सहभागातूनच विकसित भारताचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या माय भारत पोर्टलवरील उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे प्रतिपादन बीडचे जिल्हा युवा अधिकारी सागर उज्जैनकर यांनी केले.
केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आयोजित विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विज संदर्भात विशेष विद्यार्थी संवाद व मार्गदर्शन सत्र तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. जी. निकाळजे होते. माय भारत युथ आयकॉन सिद्धार्थ वाघमारे आणि सनी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. सागर उज्जैनकर यांनी माय भारत पोर्टलचे स्वरूप आणि विकसित भारत क्विजच्या विविध टप्प्यांची माहिती देत देशाच्या विकासात तरुणांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. सिद्धार्थ वाघमारे यांनी या पोर्टलद्वारे तरुणांसाठी राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असणाऱ्या विविध संधींविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डी. जी. निकाळजे यांनी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत जास्तीत- जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या विचारांना व ज्ञानाला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन केले. डॉ. योगिता लांडगे यांनी सूत्रसंचालन केले.