धरणग्रस्तांच्या प्रश्नावर युवा संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
-----
माजलगाव, ता. १६ (बातमीदार) : माजलगाव धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या युवा संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या पुढाकारातून झालेल्या या भेटीत धरणग्रस्तांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शेटे यांनी सांगितले.
धरणाच्या उंचीवाढीला २२ गावांचा विरोध असून, यापूर्वी १९८०-८५ दरम्यान ३० ते ३२ गावांचे पुनर्वसन झाले आहे. यातील अनेक शेतकरी भूमिहीन झाले असून, पुन्हा धरणाची उंची वाढल्यास माजलगाव, वडवणी व गेवराई तालुक्यातील सुपीक शेती पाण्याखाली जाण्याची भीती शिष्टमंडळाने व्यक्त केली. उंची वाढविण्याऐवजी धरणातील गाळ काढावा अथवा बॅरेजेस उभारण्याचा पर्याय स्वीकारावा, अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर फडणवीस यांनी एकाही शेतकरी किंवा प्रकल्पग्रस्तावर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव एकनाथ डवले यांना प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे शेटे यांनी सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने डवले यांची भेट घेऊन प्रशासकीय कार्यवाहीबाबत चर्चा केली.
-----